Friday, 26 August 2016


पंचमहाभूते


पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतांची नावे पाठ झाली की आपण अाध्यात्माच्या परीक्षेत पास झालो असे वाटायला लागते. सगळ्यांना नाही तरी बऱ्याच जणांना. मग ते आपले ज्ञान पाजळायला सुरुवात करतात. लेखक असतील तर लेखात ती नावे घुसवतात. वक्ते असतील तर भाषणात पंचमहाभूतांचा उल्लेख करून थोडा पाॅज घेतात व श्रोत्यांना टाळ्या वाजविण्याची संधी देतात. श्रोतेही अपेक्षाभंग करीत नाहीत व 'टाळ्याच हव्या ना, मग घ्या की' असा विचार करून कडकडाट करतात. थातुरमातुर कवी मंगलाष्टकात हीच पाच नावे घुसवून आपल्या आध्यात्मिक पातळीचे रुखवत मांडतात. उदाहरणार्थ:

पृथ्वी, आप नि तेज, वायु जमले, आकाश हा मांडव
धर्मी, शूर, सुहास्य, सुंदर असे आला तुम्ही पांडव
पाषाणी, जळि, काष्ठि आणि स्थळि ह्या वर्षावती अक्षता
थांबूनी जणु कालचक्र वदते, कुर्यात सदा मंगलम्

किंवा

पृथ्वी, आप नि तेज, वायु जमले आकाशिच्या मांंडवी
धर्माच्या समरात मूठ वळते सत्याग्रही पांडवी
द्रव्ये पाच मिळून धार धरता पंचामृतस्नान हो
पंचांचे मुखि आज न्याय अवघा, कुर्यात सदा मंगलम्

तेच ते पंचमहाभूतं खेळवत राहायचे आणि मंगलाष्टकांची फॅक्टरी चालवायची. पण कोण ही पाच महाभूते? काय त्यांचे कार्य? आपला त्यांच्याशी काय संबंध? असे प्रश्न विचारणे म्हणजे शिव शिव शिव!

पंचमहाभूतांची कल्पना जगभर पसरलेली आहे. भाषेनुसार शब्द वेगळे वेगळे एवढेच. देशानुसार, धर्मानुसार कल्पनेत थोडेफार बदलही आहेत. पण साऱ्या कल्पनात मूळ धारा तीच आहे हे सत्य डोकावल्याशिवाय राहत नाही.

इंग्रजीत या भूतांना elements म्हणतात. पंचमहाभूते म्हणजे five elements. विश्वाचे पाच मूल घटक. कुठलीही physical, म्हणजे भौतिक गोष्ट ज्या मूल तत्त्वांपासून बनते ती पाच तत्त्वे. खरे म्हणजे या भूतांपासून जी बनते तीच भौतिक गोष्ट. भौतिक हा शब्दच भूत धातूपासून आला. ती भौतिक गोष्ट मग तारा असो की आपल्या करंगळीचे नख. भौतिक विश्व बनविणारे हे पाच प्रकारचे जणू अणू, elements, atoms. कुठलीही अस्तित्त्व असलेली वस्तू बनविणारे हे पाच बोक्कामुच्चु. कुठलीही भौतिक, physical गोष्ट कशी बनते हे सांगणारी ही प्राचीन, सार्वभौम, सर्वमान्य Atomic Theory. आपण आजकाल उदजन (hydrogen), हीलीयम (Helium) वगैरे जे अणू सांगतो ते मूळ नसून हे पाच अणू विश्वव्याप्त भौतिकांचे मूळ घटक. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. Earth, Water, Fire, Air, Aether. पंचबोक्कामुच्चु.

चीनमध्येही पंचमहाभूतांची कल्पना आहे. जरा वेगळी. त्यांना पंचमहाभूते असे न म्हणता वू झिंग (Wu Xing) म्हणतात. पाचांची नावे पण त्यांच्या नाकासारखी नकटीच. पाच महाभूते म्हणजे मू (mu म्हणजे लाकूड, वृक्ष), हुओ (huo म्हणजे अग्नी), तू (tu म्हणजे पृथ्वी), जिन (jin म्हणजे metal, धातू) व शुई (shui म्हणजे जल, आप). ही कुठल्याही पदार्थाची, म्हणजे matter ची मूल भूते न मानता शक्तीची, म्हणजे एनर्जीची भिन्न रूपे ते लोक मानतात.

चीनी लोक या पंचशक्तींचे एक चक्र निर्माणाचे व एक चक्र विनाशाचे असते असेही मानतात. सुंदर कल्पना आहे. अगदी आपल्याच विष्णू व शिवासारखी.

निर्माणचक्र असे:

Wood feeds Fire,
Fire creates Earth (ash),
Earth bears Metal,
Metal collects Water,
Water nourishes Wood.

आणि विनाशचक्र असे:

Wood parts Earth,
Earth absorbs Water,
Water quenches Fire,
Fire melts Metal,
Metal chops Wood.

प्राचीन, अतिप्राचीन काळी जरी प्रवासाची साधने नसली तरी विचारांची देवाणघेवाण होतच असावी. मानव ही भटकी जमात असावी व सांगोवांगी विचार पसरत असावे. असे होताना ते थोडेफार बदलतही असावे, metamorphose होत असावे. पण तरी विचारांचे पोत तेच राहत असावे. काही का असेना, पंचमहाभूतांची कल्पना विश्वव्यापी होती. निर्माणाची आशा व संहाराची भीती मनामनात होती. साध्या भूताला आपण घाबरतो. बोबडी वळते. ही तर पंचमहाभूते.

हे पाच जण, हे पाच मूल घटक प्रत्येक दिसणाऱ्या, अस्तित्व असणाऱ्या गोष्टीमागे असल्यामुळे त्यांना बहुतेक सर्व धर्मात देवांचा दर्जा प्राप्त झाला. भूदेवी, जलदेवता, अग्निदेव वा सूर्यदेव, वरुणदेव त्यामुळे समजण्याजोगे आहेत. आकाश जरी देवरूप नसले तरी ते सर्व देवांचे निवासस्थान म्हणून देवतुल्यच. काहीही झाले की देवाचे आभार किंवा त्याकडे तक्रार, किवा याचना करायला भाविक आकाशाकडे पाहूनच हात जोडतो. असे हे पाच देवतुल्य, देवसम मूलभूत घटक. निर्मात्याच्या पंचपाळ्यातले पाच मसाले. पंचदेव म्हणा वाटल्यास. त्यांच्यापासून व त्यांच्यामुळेच सर्व काही. म्हणजे पुन्हा देवच सर्व निर्मितीचा बोक्कामुच्चु.

आपला देहही पंचमहाभूतांचाच बनलेला आहे म्हणतात. देहातील प्रत्येक महाभूताला शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ते शुद्ध करण्याचे बळ फक्त पंचगव्यात आहे असे म्हणतात. गाईबद्दल 'तृणं चरन्ती अमृतं क्षरन्ती' उगाच नाही काही सांगितले. कोणते गव्य आपल्या देहातल्या कोणत्या महाभूताला शुद्ध करतात तेही स्पष्ट सांगितले आहे. गोमय (म्हणजे सोप्या मराठीत गाईचे शेण) खाण्याने देहाच्या पृथ्वी महाभूताचे शुद्धीकरण होते. लोण्याने आप (म्हणजे जल) महाभूताचे, तुपाने तेज (म्हणजे अग्नी) महाभूताचे, गोमुत्राने वायू महाभूताचे, व दह्याने वा ताकाने आपल्या शरीरातील आकाश महाभूताचे शुद्धीकरण होते. म्हणून तर श्रावणीला (म्हणजे श्रावणातल्या पोर्णिमेला, म्हणजेच राखी पोर्णिमेला, म्हणजेच नारळी पोर्णिमेला) पंचगव्य प्राशन करतात लोक मंत्रोच्चारात. असे देहाचे शुद्धीकरण जे करीत नाहीत त्यांना मोक्षप्राप्ती नसते. सगळे कसे नीट पद्धतशीर आखून दिलेले. तरी पण मूर्ख लोक, नास्तिक लोक त्याचे पालन करीत नाहीत व नरकात जातात. असो. आपण काय करणार? किती सांगायचे त्यांना? शेवटी त्यांचे नशीब त्यांच्या सवे.

पण नुसती देहाची शुद्धी करूनच भागेल का? देहातील त्या पंचमहाभूतांवर संस्कार पण झाले पाहिजेत. त्याकरिता पंचतत्त्वाचे अध्ययन, पठन नित्य हवे. ही पंचतत्त्वे कोणती? तर वेद, पुराण, उपनिषद, स्मृति व श्रुति. म्हणून कीर्तन, पुराण, भागवत सप्ताह, भटजी वगैरे वगैरे महत्त्वाचे. हे आध्यात्मिक अंग ज्याला नसेल तो म्हणजे, त्याचं म्हणजे, आता काय सांगावं?

एक प्रश्न असाही पडतो की सर्व काही पाचच कसे? पंचमहाभूते, पंचगव्य, पंचतत्त्व, पंचपाळे, पंचेंद्रिय, हाताला पाच बोटे, ब्रह्मदेवाला पाच तोंडे (कालभैरवाने एक छाटण्या आधी). संशोधनाचा विषय आहे.

चार्वाकापूर्वी सर्व काही देवनिर्मित असेच चित्र रंगविण्यात आले. केवढा भार देवावर? जे काही होते, आहे व होणार आहे त्याला तोच जबाबदार. बरे तो पुढे येऊन 'नाही हो! मी असे काहीच केले नाही! मला का वेठीस धरता?' किंवा 'तर मग? मीच सर्व काही केले, करतो, करणार.' असे म्हणणार नाही. कारण तो पडला बोक्कामुच्चु! तो सत्य जाणून घेण्यात मानवाला पुढे येऊन मदत करणार नाही. 'Nature is not obliged to reveal its secrets to mankind' असे एक सुंदर वाक्य ऐकल्याचे आठवते. Nature ऐवजी God असा शब्द घातला की निसर्गगूढ जाणून घेण्याच्या मानवाच्या मूळ जिज्ञासू वृत्तीमुळे त्याला कोणाच्याही मदतीशिवाय  किती मोठा पहाड चढायचा आहे हे समजणे शक्य आहे. तो पर्वत पादाक्रांत होईल की नाही याचा केवळ अंदाज लावता येईल. पण मानवाला प्राचीन कालापासूनच विज्ञानाचे, विचारबुद्धीचे शस्त्र मिळाले आहे. विज्ञानाला 'तू माझा सांगाती' म्हणून मानव तो पहाड कर्मठतेने चढतोच आहे.

पर्वत जे चढत नाहीत त्यांना दुरून पर्वतशिखर दिसते. पण जे पर्वतारोहण करण्यासाठी त्याच्या पायथ्याजवळ येतात त्यांना शिखर दिसत नाही. ते नक्की आहे हे फक्त माहीत असते. वर वर गेले तर आपण वा आपल्या पायवाटेनी मागाहून येणारे कोणीतरी कधीतरी शिखरावर पोहोचतीलच पोहोचतील एवढा अदम्य विश्वास व विज्ञानाची शिदोरी घेऊन हा पथिक निघतो. थोडे का होईना वर जातो, वाटेवर आपल्या पाउलखुणा पद्धतशीर उमटवतो, जेणेकरून मागून येणाऱ्यांचे कार्य सुकर होईल, आणि आपले कार्य आटोपून 'नाही चिरा, नाही पणती' असा पंचमहाभूतात विलीन होतो. अशा अनेक पथिकांची शृंखला चार्वाकाने सुरू केली व मागून येणारे त्याचे वंशज मुंग्यांसारखे त्याच शिखराकडे मार्गक्रमण करीत आहेत. कोणत्याही महान कार्याला कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी सुरुवात करावीच लागते. ती चार्वाकाने केली. खरे म्हणजे त्या आधीच केशकंबलीने केली. खरे म्हणजे त्याआधीच कोणीतरी केली असेल. जिज्ञासा हे बुद्धिदान असलेल्या मानवाचे अविच्छेद्य लक्षण आहे. त्यामुळे सत्याचा हा शोध अतिप्राचीन काळीच मानवाने सुरू केला असावा असे म्हणायला काही हरकत नाही. पंचमहाभूते हा त्याच मार्गावरचा एक महत्त्वाचा 'मील का पत्थर' आहे.

एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या एका पर्वतारोहीला कुणीतरी विचारले 'But why do you have to conquer Everest?'. त्याचे उत्तर फार मार्मिक होते: 'Because it is there.'. हीच विज्ञानमार्गाच्या पथिकांचीही वृत्ती असते. असावी.

पंचमहाभूतांच्या कल्पनेचे मूळ reductionism, म्हणजेच विश्लेषणवाद हे आहे. प्रत्येक गोष्ट ही काही मूल घटक, elementary particles पासून बनली असावी असा कयास व कटाक्ष त्यामागे आहे. स्वयंपाकासारखेच ते आहे. तिखट, मीठ, गूळ, साखर, तेल, गहू, तांदूळ दिले तर कोणीही सुग्रण कितीतरी निरनिराळे पदार्थ करून खाऊ घालेल. शहाजहानला आग्ऱ्याला कैदेत ठेवल्यावर उदार होऊन त्याच्या मुलाने (म्हणजे आपला औरंगजेब हो) त्याला विचारले म्हणतात की 'पापाजान, हम आपको कोई भी एक अनाज साल भर दे सकते है । आप बताईये जो आपको अच्छा लगे ।'. शहाजहान ने हरबरा, म्हणजे चणा निवडला म्हणतात. वऱ्हाडी लोकांना त्याचा हा निर्णय पटेल. कारण आता शहाजहान चून (आजकाल ज्याला बेसन म्हणतात ते), गोळा, भरडा, कढी, भजे, थापी वड्या, छोले, वडे, लाडू, वड्या, बुंदी, चकल्या, शेव ... काय काय खाऊ शकेल. रोज खारे गोड, रोज मेजवानी. सांगायचे तात्पर्य हे की अनेक पदार्थांमागे हरबरा हे एक मूल तत्व असते. आचाऱ्याचे एक महाभूत.

हीच विचारांची कडी पुढे नेली तर सर्व भौतिक, physical गोष्टी किंवा पदार्थामागे काही मोजकी मूलद्रव्ये असली पाहिजे हा विचार तर्कशास्त्रसंमत दिसतो. कुठल्याही गोष्टीचे जर विभाजन करीत गेलो, reduction करीत गेलो तर शेवटी काही अशी द्रव्ये आढळतील की जी विभाजित होत नाहीत, ती मूलद्रव्ये कोणती असावी, तर जी सर्वत्र दिसतात ती. जमीन, पाणी, अग्नी, हवा व आकाश.

हेच ते reductionism किंवा हाच तो विश्लेषणवाद. अतिप्राचीन काळी मानव प्रत्येक निर्मित गोष्ट पंचमहाभूतांपासून बनलेली असते या निष्कर्षाप्रत पोहोचला. अचाट व अफाट प्रतिभेचा तो धनी. नंतर ह्या पंचमहाभूतांना देवांचा दर्जा देणे वगैरे आक्षेपार्ह वा भूषणास्पद मानणे, न मानणे यावर या निष्कर्षाचे महत्त्व अवलंबून नाही. नंतरचा आस्थेचा, श्रद्धेचा, पूजेचा भाग दुर्लक्षित करायला हवा. तो एक वेगळा बिझिनेस होता यावर आता बरेचसे एकमत आहे. पण मूळ सिद्धान्त, विश्वात अगणित विविधता असली तरी त्यामागे काही मोजके घटकच असले पाहिजे हा विचार, पूर्णतया विज्ञाननिष्ठ होता व आहे. ते पाच आहेत, की पन्नास हा मात्र संशोधनाचा विषय होता, आहे व राहणार आहे. त्या अंतिम सत्याच्या पर्वतशिखराकडे मानवाची कूच सुरू आहे. सुरुवात पंचमहाभूतांपासून झाली. पंचमहाभूतांची कल्पना हा त्या पर्वताचा base camp म्हणा ना.

विज्ञानयुगात महाभूतांवर खूप संशोधन झाले. ती पाच नसून अनेक आहेत हे कळायला लागले. आजपासून १०० वर्षांपूर्वीपर्यंत शंभराहून ज्यास्त भूतांचा शोध लागला होता. शंभराहून ज्यास्त elements चा, मूलधातूंचा शोध लागला होता. पूर्ण यादी इतरत्र उपलब्ध आहे. पण काही नावे दिली तर ही नवी भूते कोण हे कळेल. १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत विश्वातील जवळ जवळ २०-२५ महाभूतांचा, म्हणजे elements चा शोध लागलेला असावा. त्यांचे नाव मात्र भूत नसून 'अणू', Atom झाले होते. इंग्रजीत मात्र elements च टिकून राहिले. हे अणूच विशिष्ट प्रमाणात एकत्र येऊन रेणू, म्हणजे molecules तयार होतात. उदाहरणार्थ, पाणी, म्हणजे 'आप' नावाचे तोपर्यंत पंचमहाभूतातले एक असलेले भूत, भूत नसून उदजनाचे दोन अणू व प्राणवायूचा एक अणू मिळून तयार झालेला रेणू आहे हे विज्ञानाने सिद्ध झाले. तसेच हवा म्हणजे दोन प्राणवायूचे अणू मिळून तयार झालेला प्राणवायूचा रेणू व नत्रवायूचे दोन अणू मिळून तयार झालेला नत्रवायूचा रेणू यांचे मिश्रण आहे हे सिद्ध झाले. पुढे हवेतच या व्यतिरिक्त अॅरगाॅन, क्रिप्टाॅन, क्झेनाॅन, निआॅन व हीलियम वायूही आहेत हे सिद्ध झाले. म्हणजे 'वायू' हे महाभूत नाही हे कळले. त्याचेही घटक आहेत. तसेच पृथ्वीचे म्हणजे मातीचे. वाळू म्हणजे सिलिकाॅनचे दोन व प्राणवायूचा एक अणू मिळून तयार झालेला सिलिकाॅन डायआॅक्साईड नावाचा रेणू आहे. तसेच मातीत ठिकाणपरत्त्वे कधी लोह धातूचे प्राणवायूबरोबर तयार होणारे फेरस वा फेरीक आॅक्साईड, कधी मँगनीज डायआॅक्साईड, कधी अॅलुमिनियम व आॅक्सीजन मिळून झालेला अॅलुमिना तर कुठे असेच इतर धातूंचे आॅक्साईड्स्. माती म्हणजे तर elements चा खजिना. सोने, चांदी, सारे सारे त्याच मातीत. पृथ्वी हे मग महाभूत न राहता अनेक प्रकारच्या रेणूंचा खजिनाच झाला. पृथ्वी, आप आणि वायू ही पंचमहाभूतातली तीन महाभूते आता भूते राहिली नाहीत. पण ती स्वत:च इतर विविध भूतांपासून, अणूरेणूंपासून बनली आहेत हे सिद्ध झाले. आकाश म्हणजे तर काही नाहीच. शून्य, nothing, zilch. राहता राहिले अग्नि महाभूत. ते तर पदार्थच आता मानल्या जात नाही. ती फक्त शक्ति, energy.

हे सर्व शोध लागले आणि पंचमहाभूतांची कल्पना पंचमहाभूतातच विलीन झाली. अर्थात त्यांना देण्यात आलेले देवरूप आस्तिकांच्या मनातून गेले नाही. ती भूते त्यांच्या डोक्यात घर करून राहिली. त्याला इलाज नाही.

शंभर वर्षापूर्वीपर्यंत पंचमहाभूतांची जागा या मूल धातूंनी, elementsनी घेतली. हे मूलपदार्थ आहेत अशी त्यांना मान्यता मिळाली. हे atoms indivisible आहेत असे ठरले. पण यांना कोणी देव मानले नाही कारण काळ बदलला होता. पण हेच विश्वाचे बोक्कामुच्चू आहेत हे मात्र सर्वमान्य झाले.

मूल धातू अच्छेद्य आहेत, अणू अविभाज्य आहेत हे सत्य जवळ जवळ जगमान्य झाले खरे. पण चार्वाक कुठले मानायला तयार? त्यांना तर अणूत घुसून तो कसा बनला हे पाहायचे होते. प्रत्येक निर्मित गोष्टीला निर्माता असलाच पाहिजे हा अट्टाहास काही नवा नाही. हा आस्तिकांचा अट्टाहास त्यांच्यावरच कसा उलटवण्यात आला ही गोष्ट फार मजेशीर आहे. वनस्पती, प्राणी, जीव, जंतू, चल, अचल, सजीव, निर्जीव आपल्याला दिसते, जाणवते. त्यांचा निर्माता कोणीतरी हवाच. पण ते इतके काही विविध व अफाट आहेत की तो निर्माता अति महान, सर्वशक्तिमान असलाच पाहिजे. तोच तो देव. हे आस्तिकांचे देवाच्या अस्तित्त्वाचे 'प्रूफ' असते. त्यांना पटते. पण एकदा एका फाजील चार्वाकाने तेच त्यांच्यावर उलटवले. त्यांचेच प्रमेय वापरून तो म्हणाला की म्हणजे तुमच्या देवांचाही निर्माता असायला हवा. तो कोण आहे? तर्कशास्त्रात याला self reference म्हणतात. तुमचेच प्रमेय तुमच्याच प्रमेयावर वापरणे. यावर मग आस्तिकांकडे उत्तर नसते. मग ते 'जाऊ दे नं. तुम्हाला नाही समजणार ते. ते समजण्यासाठी पण अधिकारी व्यक्ती हवी.' असे म्हणत कशीबशी आपली सुटका करून घेतात. आपण हारलो हे माहीत असले तरी चेहऱ्यावर लटका विजयाचा भाव आणतात व हसून वेळ मारून नेतात. आस्तिक नास्तिक दोघेही खुष. तेरी भी चुप. मेरी भी चुप. असो.

तर शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीपर्यंत अणू अभेद्य होता. Elementary Particle होता. अणू कसा बनतो हे मानवाकरिता गूढ होते. पंचमहाभूतांची जागा त्यावेळी साधारण नव्वद शंभर अणूंच्या यादीने घेतली होती. त्यातले बरेच अणू मानवाला सृष्टीत आढळलेही. Dmitri Mendeleev नावाच्या वैज्ञानिकाने त्याचे वर्गीकरण करून त्यांना एका तक्त्यात छान बसायला जागा दिल्या. १८६९ साली त्याने आपला पहिला Periodic Table प्रसिद्ध केला.

पण एवढ्याने झाले नाही. आणखीही काही अणू असावे असा कयास होता. अणूचेही घटक असावे असाही एक कयास होता. शिखर अजून पुढेच होते व तेथवर अजून पोहोचायचे राहिले होते. पुढे पायवाट नव्हती. त्या मार्गाने तोवर कोणी गेला नव्हता.

१८९७ मधे J J Thomson त्या दृष्टीने एक प्रयोग करीत होता. एका निर्वात परीक्षण नलिकेतून cathodic rays जातात,म्हणजे काहीतरी जाते, व तेच अणूचे काही भाग असावे असे त्याला वाटले. एका लेखात त्याने तसे लिहिलेही. आणखी काही वैज्ञानिकांनी पडताळा घेऊन पाहिला. JJ नेही आणखी प्रयोग करून आपली खात्री करून घेतली. खुंट हालवून पाहणे हे वैज्ञानिकांना फार आवश्यक वाटते. 'मला असा दृष्टांत झाला' असे म्हणून चालत नाही. कोणी विश्वासही ठेवत नाही. पण JJचा कयास खरा ठरला व कॅथाॅडिक rays म्हणजे लहानशा पण असंख्य इलेक्ट्राॅन्स् चा प्रवाह ठरला. अणुविच्छेद झाला. पुढचे शिखर दिसू लागले. नवी महाभूते दिसू लागली.

पण अणू तर न्यूट्रल असतो. मग ऋणविद्युतधारी इलेक्ट्राॅन्स् आहेत म्हणजे धन विद्युत असलेलेही आणखी कोणी त्या अणूत असायला हवे. १९११ मधे Ernest Rutherford ने प्रयोगांती प्रोटाॅन्सचा शोध लावला. इलेक्ट्राॅन व प्रोटान यांचे वजन किती ते ठरले. प्रोटाॅन फार वजनी. इलेक्ट्राॅनपेक्षा १८६० पट भारी. दोघांवर किती चार्ज असतो ते ठरले. विज्ञानाला सर्व दुवे सांधावे लागतात. गप्पा चालत नाहीत. १९३२ मध्ये James Chadwick ने न्यूट्राॅन्सचा शोध लावला. तीस बत्तीस वर्षात अणू कसा बनतो ते चित्र स्पष्ट झाले.

पाहता पाहता सर्व अणु ऋण विद्युत असलेल इलेक्ट्राॅन्स, धनविद्युत असलेले प्रोटाॅन्स, न्यूट्रल न्यूट्राॅन्स यांनी बनलेला असतो हे सिद्ध झाले. प्रोटाॅन्स आणि न्यूट्राॅन्स अणूच्या केंद्रभागी असून इलेक्ट्राॅन्स त्यांच्याभोवती फिरत असतात हे कळले. जणू सूर्यमालाच. अणूमध्ये जितके प्रोटाॅन्स असतात तितकेच इलेक्ट्राॅन्स् असतात व म्हणून त्यावर एकूण चार्ज शून्य असतो हे कळले. Electrons वेगवेगळ्या कवचात (shell) फिरतात हे कळले. हे अगदी कांद्याला असतात तसे थर. प्रत्येक कवचात इलेक्ट्राॅन्स वेगवेगळ्या कक्षेत (orbits) फिरतात हे कळले. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कवचात (टरफलात म्हणा वाटल्यास) ज्यास्तीत ज्यास्त २, ८, १८, ३२ इलेक्ट्राॅन्स असतात हे कळले. एकूण अणू किती असू शकतात याचा हिशोब कळला. उलगडा होत गेला. शिखर सर झाले असे वाटले. एकूण ११८ elements असू शकतात हे सिद्ध झाले. त्यांना नावेही देण्यात आली. काही सृष्टीत सापडतात. काही प्रयोगशाळेत तयार होता. हे सर्व ज्ञान पाठ्यपुस्तकात आले. Mendeleev चा तक्ता, periodic table सुधरवण्यात आला. त्याने ते ११८ अणू पद्धतशीर एका साच्यात बसविले. तो साचा त्याच्याच नावाने Mendeleev Periodic Table म्हणून आजही प्रसिद्ध आहे. 'मेंडिलीव्हस्य नूतन महाभूताय पिरिआॅडिक टेबलाय नम:' म्हणावे असे याचे महत्त्व. आपल्याला संस्कृत येत नसले म्हणून काय झाले? मंत्रासारखे काही तरी आपल्या तोंडातून नित्य झरत असले की झाले. लोकांवर आपल्या विद्वत्तेची छाप पडते. असो.

आज शाळाशाळातून periodic table चे व Atomic Theory चे अध्ययन होते. आता atomic theory मधे पंचमहाभूते म्हणजे पाच एलिमेंट्स नाहीत. ११८ आहेत. हे ११८ अणू श्री ११८ महाभूते ठरली. इलेक्ट्रान, प्रोटाॅन, न्यूट्राॅन हे या महाभूतांना घडविणारे महामहाभूते ठरले. जुनी पंचमहाभूते व त्यांचे अधिष्ठाते देव जुन्या देवघरातच राहिले. आणि आस्तिकांच्या जुनाट डोक्यात.

जुने पाच बोक्कामुच्चु जाऊन नवे ११८ बोक्कामुच्चु आले. पण हे मात्र खरेच आहेत हे आपण सिद्ध करू शकतो. ते conjecture नाहीत. ते देशपरत्त्वे, धर्मपरत्त्वे वेगळे नाहीत. पण त्यामुळेच की काय, त्यांना देवाचा दर्जा मिळाला नाही. उदजनाचे नवरात्र, रेडियम पंचमी, सोडियम पौर्णिमा वगैरेंचा सण साजरा होत नाही. सत्याला देवदर्जा देण्याची काय गरज? जे आहे ते आहे.

पण सत्याचे शिखर खरेच पादाक्रांत झाले का? की आणखीही काही elementary particles आहेत? संशोधन सुरू आहे. नवे बोक्कामुच्चु प्रकाशात येत आहेत. फोटाॅन हा प्रकाशाचा elementary particle असा शोध लागला. Quantum पार्टिकल्स उजेडात आले. आपल्या सत्येंद्रनाथ बोसांनी पण या संशोधनाच्या वादळात खूप मोलाचे काम केले. फोटाॅन सारखे quantum particles त्यांच्या नावाने बोसाॅन (Boson) म्हणून प्रसिद्ध झाले. बाकीचे दुसरा वैज्ञानिक Fermi च्या नावाने फर्मीआॅन म्हणून ओळखल्या जाऊ लागले. नव्या Atomic Theory ने खरोखर जुन्या धारणा व सारे विचारविश्वच बदलले.

आता सर्वच स्पष्ट झाले असले तरी इतके क्लिष्ट झाले आहे की काही विचारू नका. आधी किती सोप्पे होते. फक्त पंचमहाभूते. पंचाईतच नको. हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी. त्यांची देवात गणना झाल्यामुळे नावे लक्षात ठेवायलाही सोपे. त्यांना मूर्तीत पकडणे शक्य. पूजारतीने प्रसन्न करणे शक्य. ही नवी ११८ भूते आणि बोसाॅन, फर्मिआॅन वगैरे मंडळी मात्र काही म्हणजे काही ऐकायला तयार नाहीत. काही केल्या प्रसन्न होत नाहीत.

काय करावे? देव सोडून ह्या वैज्ञानिकांना हात जोडावे. या ११८ महाभूतांची नावे घ्यावी. हेच खरे विश्वव्यापी बोक्कामुच्चू. त्यांचे स्मरण करावे. Mendeleev च्या Periodic Table ची विज्ञानाच्या देवघरात तसबीर लावावी आणि पुढच्या लिंकवर दिलेली त्यांची आरती म्हणावी. म्हणतांना टाळ कुटायला हरकत नाही. आरती करून बुद्धीचे दान मागावे. नक्की मिळेल.

https://m.youtube.com/watch?v=VgVQKCcfwnU

करून पहा. निसर्गाचे गूढ कळेल. श्रावणीला पंचगव्य प्राशन न करता देहशुद्धी होईल. वेद, पुराण, उपनिषद, स्मृती, श्रुती या पंचतत्त्वांचे अध्ययन न करता मोक्ष मिळेल. नवी महाभूते खरेच प्रसन्न होतील. भेटायला येतील. स्वत:ची ओळख करून देतील. गाढ आलिंगन देतील. पहा आलीच नवी महाभूते ....

https://m.youtube.com/watch?v=EMDrb2LqL7E

_____________________

Monday, 1 August 2016

देवी


मराठीत देवी किंवा हिंदीत माता. शब्द वेगळे पण 'मातृ देवो भव' लक्षात घेतले तर वेगळेपणा नाहिसा हेतो. दोन्ही शब्द अगदी सेम टु सेमच म्हणा ना. तर अशा ह्या देवीने प्राचीन काळी हजारो वर्षे, आणि खास करून आता आताच्या काळात जवळजवळ अडीचशे वर्षे खूपच गाजवलीत. ही जगभर, घरोघरी असायची.

बंड्याला दोन तीन दिवस फ्लूसारखा ताप आला. थंडी वाजली, हुडहुडी भरली. डोके दुखले. पाठ दुखायला लागली. ओकारी, म्हणजे उलटी, झाली. दोन तीन दिवसांनी बरे वाटले. पण चौथ्या दिवशी पाठीवर, पोटावर, तोंडावर, हातावर बारीक पुरळ उठत आहे असे वाटले. त्या फुटकुळ्या दोन दिवसांनी बुजण्याऐवजी आणखीनच टुसटुसल्या, पसरट झाल्या, पाण्यानी भरल्यासारख्या दिसायला लागल्या. फुटून पाणी निघून गेले की मग ओसरतील असे वाटले. पण तसे न होता त्या पाण्याचाच रंग पिवळसर होत होत आता पू सारखा दिसू लागला. पूसारखा काय, पूच तो.

सारे जण 'देवी देवी' म्हणायला लागले. बंड्याला घाबरा़यला लागले. वैद्याला दाखवले. तेही 'देवी' म्हणाले. बंड्याला वेगळे ठेवा म्हणाले. खरे म्हणजे त्याला आता ताप वगैरे नव्हता. तरीपण त्याला झालेला रोग इतरांना होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी असे डाॅक्टर म्हणाले. पण बंड्याचे आईवडील काय जुमानतात? मुलांचा ताप आईबाबांना लागत नसतो असे ते म्हणायचे. आई आणि बाबा दोघेही आता उगाचच आपल्या चेहऱ्याला हात लावून बघायचे. त्यांना त्यांचे बालपण आठवले असावे. त्यांच्यावरही लहानपणी असाच देवीचा कोप झालेला होता. काय पाप केले होते ते देवच जाणे. खरे म्हणजे दोघांच्याही आईवडीलांनी, म्हणजे बंड्याच्या दोन्ही आजीआजोबांनी नंतर पापाचा उतारा व्हावा म्हणून भटजी म्हणाले ते सारे केले होते. पण याही पिढीत देवीचा कोप झालाच झाला. अगदी सोडत नाही ही. असो.

बंडूचे ते गुंजेएवढे आंगभर आलेले असंख्य फोड बरे होतांना दिसले. पू जणू जागच्या जागीच आटून गेला. खपल्या धरल्या. त्याही पडल्या. कडुनिंबाच्या पाण्याने बंडूला आंघोळ घालण्यात आली. चेहऱ्यावर, आंगभर त्या देवीचे गड्डे, व्रण मात्र देवीच्या कोपाची साक्ष म्हणून बंडूला जन्मभर वहन करावे लागतील. तेच त्याचे प्रायश्चित्त. गतजन्मीच्या पापांचे. पण जीव मात्र वाचला. बंडू बरा झाला. आईबाबांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण आता बेबीला अगदी तसाच ताप यायला लागला. आईबाबांनी देवाला नमस्कार केला व पुन्हा कंबर कसली. काहीही न बोलता. दोघेही अगदी बोक्कामुच्चु.

घरोघरी, देशोदेशी हीच कथा. देवीच्या कोपाला मानवजातीला फार मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागायचे. करणार काय? पापे करतांना लाज वाटत नाही. कोप होणारच. गतजन्मीचे असो, की या जन्मीचे. पाप ते पापच. प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये तर या रोगाला पापरोग असेच नाव आहे. जंबुद्वीपावरील मागासलेले भारतवर्षच नाही तर इतर देशांमधे सुद्धा देवीची लागण एक मोठीच समस्या होती. अठराव्या शतकात लोकसंख्येच्या जवळजवळ ६०-७० टक्के लोकांना देवीची लागण होऊन त्यातले अनुमाने २०-३० टक्के रोगी दगावत असत. देवीचा कोप. मानव काय करणार? काय करू शकणार?

देवी, म्हणजे small pox सर्वदूर पसरला होता. महासंहारक अशा ह्या रोगाने अठराव्या शतकात तर भयानक रूप धारण केले होते. रोगावर अनेक जमातीत अनेक समज पसरले होते. अनेक उपाय अनेक जण सुचवायचे, पण काही म्हणून काही चालेना. अनेक वदंताही पसरल्या होत्या. अनेक जनधारणा. पण रोगाला कारण बोक्कामुच्चु देवच होता यावर सर्वांचा विश्वास होता. रोगाची लागण झाली तर God's will, लागण होऊनही जीव वाचला तर God's gift.

चेहऱ्यावरचे देवीचे व्रण ही एक नेहमीच्या पाहण्यातली बाब होती. शेतकरी, कामगार, मजूर तर विचारूच नका. इंग्लंडच्या अशाच एका शेतकरी, कामगार, मजुरांच्या वसाहतीत एडवर्ड जेन्नर (Edward Jenner) नावाचा एक युवक डाॅक्टरी शिकला. नंतर मोठ्या शहरी जाऊन, शल्यचिकित्सा शिकून तो तेथेच मोठा सर्जन होऊ शकला असता. पण त्याने तसे न करता आपल्या लहानशा गावीच सामान्य जनतेत राहण्याचे ठरवले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात देवीचा प्रकोप फारच वाढला होतो. जो तो पीडित. जो तो चेहरा खोदलेला. जेन्नर उपचार करायचा, बरेचदा यशही यायचे. पण नक्की रोग देणारा बोक्कामुच्चु कोण हेच माहीत नसल्यामुळे औषधयोजना काय व कशी करायची हाच मोठा प्रश्न होता. काहीतरी ठोकताळ्यावर इलाज चालायचा. बाकी यश देणे न देणे देवाच्या हाती. देवीचा उपचार देवच होता. असा तो काळ होता.

१८७७ च्या इंग्लंडला पसरलेल्या देवीच्या मोठ्या साथीत जेन्नर त्याच्या गावीच वैद्यकी करीत होता. त्याच्या ऐकण्यात आले की गावात देवीच्या व्रणांनी विद्रूप झालेल्या अनेक स्त्रिया असल्या तरी काही मात्र सुखरूप होत्या. जुना काळ होता तो. दीडशे वर्षांपूर्वीचा. स्त्रीचे सौंदर्य ही चर्चेची बाब असे. जनतेत अशी वदंता होती की कित्येक स्त्रिया देवीच्या व्रणांनी विद्रूप (असा शब्दप्रयोग करण्याबद्दल क्षमस्व!) झाल्या असल्या तरी गवळणी, म्हणजे milkmaids मात्र आपले सौंदर्य टिकवून असतात. त्यांना देवीची लागणच होत नाही. दंतकथा, वा गैरसमज म्हणा वाटल्यास. देवी काय परिचयपत्र पाहत असेल कोपण्याआधी? असेलही बा! त्यांचं बुककीपिंग फारच परफेक्ट असत. कोणत्याही धर्मातले ते देव असोत, चित्रगुप्त किंवा इतर धर्मातील त्याचे counterparts आपले काम अगदी चोख बजावतात.

जेन्नरला सुरुवातीला ही जनधारणा सत्य वाटेना. पण त्याच्याही लक्षात कालांतराने हे आले की रूढ लोकमतात काहीतरी तथ्य आहे. गाईंचे दूध काढणाऱ्यांवर देवी प्रसन्न असायची. त्यामुळे देवीच्या फटक्याने विद्रूप झालेल्या बहुसंख्य स्त्रियांमधे मिल्कमेड्स् नितळ त्वचेमुळे आपले सौंदर्य राखून असायच्या व अधिकच उठून दिसायच्या.

रोगाची लागण आणि प्रसार यांचा राहणीशी आणि भोवतालच्या एकंदरीत hygiene शी जवळचा संबंध आहे हे डाॅक्टर असल्यामुळे जेन्नरला चांगलेच माहीत होते. त्याने गवळणींचा त्या दृष्टीने अभ्यास केला. त्याला जे दिसले ते पाहून तो थक्कच झाला. देवीच्या रुग्णाच्या चेहऱ्यावर व आंगावर जश्या फुटकुळ्या येतात तशाच त्याला बऱ्याच गाईंच्या स्तनांवर दिसल्या. त्यातही पू असायचा. म्हणजे गाईंना सुद्धा देवी येतात की काय? त्याचाच संसर्ग दुधावाटे लोकांना होतो की काय? लोकांना दूध पिऊ नका असा सल्ला दिला तर देवीची साथ न पसरण्याला मदत होईल काय? गायच बोक्कामुच्चु आहे की काय? माणसांना होणारा small pox आणि गाईंना होणारा cow pox एकच की काय?

जेन्नर भारतवर्षात असता तरी त्याच्या निदर्शनास हेच आले असते. आपली गाय काय अन् इंग्रज गाय काय. गोमाता ती गोमाता. त्यांच्या व्याधी सारख्याच. देवी, माता आणि गोमाता यांचा हा असा जवळचा संबंध मात्र भारतवर्षात गदारोळ माजवून गेला असता. देवी आणि गाय यांचा असा उल्लेख कदापि खपवून घेतला गेला नसता.

नशिबाने जेन्नर विलायतेत होता. गाय ही त्याच्याकरिता उपयोगी नक्कीच होती, पण देवाचे रूप नव्हती. गाईचा pox मानवांमध्ये small pox पसरवतो हे जर सत्य असेल तर मग गवळणींना तर या रोगाची सगळ्यात आधीच लागण व्हायला हवी होती. पण सत्य अगदी उलटेच होते. हे कोडे उलगडायला वेळ लागला पण शेवटी जेन्नरला जवळजवळ खात्री पटली की देवी झालेल्या गाईंच्या संपर्कात सतत राहिल्यामुळेच गवळणींना देवीची लागण झाली नाही. त्यांना कदाचित गाईंच्या देवी रोगाचा (cow pox चा) संसर्ग झाला असेल. पण गाईंचा तो रोग मानवांना फारसा अपायकारक नाही. गौदोहन करणाऱ्या स्त्रिया त्यांच्याच कुटुंबात राहणाऱ्या बाकी साऱ्यांना देवीची (small pox ची) लागण झाली तरी स्वत: सुखरूप राहत असत. गाईंनी त्यांना जणू अनोखी प्रतिकारशक्ती प्रदान केली असावी.

आणखी विचार करता जेन्नरला एक ब्रेनवेव्ह आली. त्याला असे वाटले की अगदी कमी प्रमाणावर जर कोणाला मुद्दामून गायदेवीचा (म्हणजे cow pox हो!) संसर्ग करण्यात आला, जसा की गवळणींना होत असावा, तर त्या व्यक्तीला फारसा त्रास न होता मानवांच्या देवी रोगाविरुद्ध एक जबर प्रकिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे नंतर देवीच्या साथींमधे ती व्यक्ति रोगाची लागण टाळू शकेल. गायदेवीचा मानवांना फारसा त्रास होत नाही. त्यामुळे हे लसीकरण सहज साध्य होईल.

वैद्यकशास्त्राला वेगळे वळण देणारा हा विचार होता. जेन्नरला या कल्पनेचा प्रयोग करायचा होता. त्याने तसे सुचवून पाहिलेही. पण त्याची फक्त टिंगलच झाली. विरोधही झाला. धर्ममार्तंडांनी (ईसाई) मानवांना पशूंच्या रोगाचा संसर्ग करणे अयोग्य असा निर्णय दिला. त्याला प्रयोग करायची परवानगी मिळाली नाही.

पण जेन्नरला त्याचा होरा नक्की काम करेल असे वाटायचे. त्याने एक दिवस आपल्याच कंपाउंडरच्या ९-१० वर्षांच्या James Phipps नावाच्या मुलाला जाणूनबुजून गायदेवीचा संसर्ग करवला. मुलाच्या हाताच्या एका रक्तवाहिनीला थोडे खरवडून त्यावर गाईच्या देवीच्या फोडातला थोडा पू घासून टाकला. त्या मुलाला cow pox चा संसर्ग होऊन मामुली ताप आला पण फारसा त्रास न होता तो दोन दिवसात बरा झाला. नंतर काही दिवसांनी त्यालाच जेन्नरने मानवांच्या देवीचा तशाच प्रकारे संसर्ग करून पाहिला. पण आता मात्र त्याला संसर्ग व त्यामुळे अपाय झाला नाही. त्याला मानवी देवी आल्याच नाहीत. आता मात्र जेन्नरचे मत अधिकच प्रबळ झाले. जेन्नरने नंतर असेच प्रयोग आणखी १५-२० जणांवर केले. कारण Reproducibility, पुन:सिद्धता हा कुठल्याही वैज्ञानिक प्रयोगाचा महत्त्वाचा निकशच असतो. विज्ञानाला one-off चमत्कार चालत नाहीत. जेन्नरने तर आपल्या ११ महिन्याच्या मुलावरही आपल्या तंत्राचा प्रयोग केला. पूर्ण खात्री झाल्यावर त्याने आपले मत एका वैज्ञानिक लेखात मांडले. पण तत्कालीन डाॅक्टरांनी, व खास करून चर्चने त्याची दखल घेतली नाही. १७९० ची वगैरे ही गोष्ट. जेन्नर १८२३ मधे मृत्यू पावला. १८४० मधे, म्हणजे केवळ १६-१७ वर्षानंतर, त्याचा शोध लसीकरणासाठी वापरण्याची परवानगी सरकारतर्फे देण्यात आली व महाभयंकर देवीच्या रोगाविरुद्ध मानवजातीचे युद्ध सुरू झाले. त्यामुळे नंतर तब्बल १३७ वर्षांनी, १९७७ मधे देवीचे निर्मूलन झाले.

जेन्नर आपला शोध पेटंट करू शकला असता. पण त्या महामानवाने तसे केले नाही. त्यामुळे त्याच्या शोधाचा नंतर जगभर जो उपयोग करण्यात आला त्याचा त्याच्या कुटुंबियांना काहीही फायदा झाला नाही. पण त्याहूनही दु:खाची बाब ही की त्याच्या महान शोधाचा मानवजातीला होणारा असीम फायदा त्याला स्वत:ला पाहता आला नाही. धर्माच्या दलालांनी त्याच्या जीवन काळात तसे होऊ दिले नाही. कुठलाही धर्म असो, विज्ञानाला त्याचा प्रखर विरोध कायम असायचा, व आजही असतो. धर्माला पाखंड हवे. आजही स्टेम सेल रिसर्चला धर्मधुरीणांचा होकार नसतोच. पण आता त्यांना फारसे कोणी विचारत नाही, विज्ञान ब्राह्मणवादाला भीक घालत नाही म्हणून विज्ञान वेगाने पुढे जात आहे.

जगात लसीकरणाची हीच सुरुवात. जेन्नर हा लसीकरणाचा जनक मानला जातो. नंतर बरेच संशोधन झाले. बऱ्याच रोगांमागे देव, दानव, सटवी वगैरे नसून वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत हे कळले. त्याच बॅक्टेरियाचा किंचित प्रमाणात डोज देऊन कोणालाही तात्पुरते वा कायमचे त्या रोगापासून अभय देता येईल हे प्रयोगांती सिद्ध झाले. मुख्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती देण्याची ती पद्धत जगमान्य झाली. जेन्नर विन्नर ठरला. पण त्याला त्याच्या हयातीत बरेच कुत्सित बोल ऐकावे लागले. तो जिवंत असतांना तर तो व्यंगचित्रांचा विषयच झाला होता. त्याने गायदेवीची लस दिलेले लोक रस्त्यावरून सैरावैरा धावताना एका कार्टूनमधे दाखविले होते. त्या सर्व लोकांना गाईचे तोंड फुटले होते. व्यंगचित्रकाराचे खूप कौतुकच झाले असणार. टवाळा आवडे विनोद. जेन्नरच्या नशिबी मात्र टिंगलच लिहिली होती. तो चार्वाक होता ना!

कालांतराने देवीची लस तयार करण्यात आली. पण ती दुसऱ्या मानवाच्या फोडापासून तयार केली गेली नाही. मानवांकरिता देवीची लस गाईच्या देवीतून निर्माण करण्यात आली. त्यासाठी गाई पाळून त्यांना देवीचा रोग होईल, cow pox होईल अशी व्यवस्था करीत. तसे झाले की तिच्या फुटकुळ्यातून वैज्ञानिक बॅक्टेरिया, जंतु काढून माणसांसाठी लस तयार करीत. खरे पाहिले तर देवीची लस त्या दृष्टीने गव्य आहे. पंचगव्यात तिचा समावेश नाही ही गोष्ट वेगळी. अशा रातीने तयार झालेली लस मग जनतेला देण्यात येत असे.

शाळाशाळातून सर्व विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे अशा प्रकारे तयार झालेली देवीची लस टोचण्यात आली. डाव्या हातावर दोन ठिकाणी त्वचेला वरवर काटेरी चक्र फिरवून लस देत असत. मुलीमुले फारच घाबरत. प्रत्येक जण रांगेत सगळ्यात मागे उभे राहायचा प्रयत्न करी. मुले रडत. पण सरकारने कित्येक वर्षे हा सक्तीच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवला. नवजात मुलामुलींना पण दोन्ही दंडांवर ही लस द्यायचे. जन्मभर त्याची खूण राहायची. दोन्ही दंडांवर देवीच्या लसीचे दोन दोन व्रण असणारी शेवटची पिढी आता चाळीशीकडे वळली आहे.

लसीकरणामुळे शेवटी जगातूनच देवी रोगाचे निर्मूलन झाले. १९७७ मधे रोगाची बाधा झालेल्या सोमालियातील Ali Maow Maalin ला देवीचा शेवटचा रोगी मानतात. तेव्हा तो ह्या जीवघेण्या दुखण्यातून वाचला. आता आता ५-६ वर्षांपूर्वी तो मलेरियाने दगावला. मलेरिया निर्मूलन अजून व्हायचे आहे म्हणून. झाले असते तरी काय? तो गेलाच असता दुसऱ्या एखाद्या रोगाने. जायला काय, मूळव्याध सुद्धा पुरते. आज ना उद्या जायचेच आहे हो सर्वांना! म्हणून हरीनाम घ्या.

१९८० मधे जागतिक आरोग्य संस्थेने (WHO म्हणजे World Health Organization) देवीचे रोगनिर्मूलन झाल्याचे जाहीर केले व लसीकरणाची आवश्यकता नाही असे सांगितले. जगातील एक महानाशक साथीचा रोग काळाच्या पडद्याआड गेला. एक युग संपले. शाळाशाळातून  दिसणारे लसीकरणाचे भीतिदायक दृष्य फक्त आठवणीत राहिले. आता देवीच्या रोगाचे बॅक्टेरिया फक्त प्रयोगशाळेच सांभाळून ठेवले आहेत. ते चोरून कोणी त्यांना प्रयोगशाळेच्या बंदिगृहातून काढून बाहेर सोडले तर पुन्हा भयानक विध्वंस होऊ शकतो. १९७८ मध्ये प्रयोगशाळेत काम करणाऱ्या एका संशोधिकेला त्याची खरेच बाधा झाली व ती दगावली. बाधा होण्याला आपण कारणीभूत आहो असे वाटून तिच्या सहयोग्याने आत्महत्या केली. देवीचा बॅक्टेरिया, महामहिम व्हॅरिओला, जिवंत बाँब आहे. पुढेमागे त्याचा जैविक आतंकवादात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे जगभरच्या प्रयोगशाळात जपून ठेवण्यात आलेले व्हॅरिओलाचे सँपल्स सुद्धा नष्ट करावे असे अनेकांचे मत आहे. अमेरिका व रशिया तसे करायला तयारही झाले होते व २०११ मधे तसे करणार होते. पण माशी शिंकली. ती केव्हा कुठे शिंकेल ते देवालाच माहीत. पण त्यामुळे देवीचा बोक्कामुच्चु व्हॅरिओला अजूनही प्रयोगशाळात जिवंत आहे व Bio-terrorism करिता भविष्यात वापरात येण्याची शक्यता अजूनही पूर्णपणे नाकारता येत नाही. पुन्हा देवीचा कोप!

पण आजतरी देवी रोग घडवणारा तो बोक्कामुच्चु डब्बाबंद झाला आहे. आपल्या देवीवर आलेला आळ चुकीचा होता. तिने बिचारीने काहीच केले नव्हते. ती काही कोपत बीपत नव्हती. रोगाला आपण उगाचच देवी असे नाव दिले. लाखो मृत्यूंचे खापर विनाकारणच देवीच्या माथी फोडण्यात येत होते.

लसीकरण, म्हणजे vaccination, नंतर अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वापरण्यात आले. काॅलरा, टायफाॅईड, गोवर, कांजण्या, पोलिओ वगैरे वगैरे. देवीसारखेच आता पोलिओचेही निर्मूलन झाले आहे. पुढे आणखी कशाचे होईल. आता तर जन्म झाल्याबरोबर vaccination सुरू होते. नंतर बूस्टर डोजेस. नंतर दुसरा, मग तिसरा बूस्टर. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले. सरासरी ३५ वर्षे आयुर्मर्यादा असलेल्या आपल्या देशात तीच सरासरी आता साठच्या वर आहे.

जेन्नर हा लसीकरणाचा आद्य प्रवर्तक, जनक. त्याच्यामुळे किती जीव वाचले असतील याची गणतीच करायला नको. किती पुण्य मिळाले असेल त्याला! आपला सहधर्मीय असता तर नक्कीच स्वर्गात गेला असता (आपला नसल्यामुळे heaven ला गेला असेल.).  जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त. पण त्यामुळे आपले किती नुकसान झाले असते? असे युगप्रवर्तक तर आपल्याला विपुल रोगराईंनी युक्त पृथ्वीवर हवे. वारंवार हवे. त्यांना तर हा फेरा कायमचा हवा. त्यांचे वर काय काम? तिथे न रोग ना व्याधी. नुसते गंधर्व आणि अप्सरा! काय हे?

Vaccination ह्या शब्दाचा जनकही जेन्नरच आहे. ह्या शब्दाचे मूळच vacca, म्हणजे लॅटिनमधे गाय असे आहे. गाईला cow pox झाला म्हणून जेन्नरला परीस मिळाला. त्याचा वापर करून त्याने वैद्यकीय चिकित्सेचा कायापालट केला. मानवाचा देवीसारख्या महाभयंकर साथीच्या रोगापासून बचाव केला. नवलाची गोष्ट म्हणजे गाईंना अजूनही देवीचा रोग ग्रासतो. कोंबड्यांनाही. मोरांनाही. Pox च्या बॅक्टेरियाच्याच त्या वेगवेगळ्या strains म्हणा ना. पण बॅक्टेरियाची मानवाला ग्रासणारी स्ट्रेन मात्र नामशेष झाली. फक्त नामच शेष राहिले त्या व्हॅरिओला बॅक्टेरियाचे. किती उपकार आपल्यावर त्या गोमातेचे. गाईला म्हणून तरी गोमाता म्हणावे. तिनेच जणू आपल्याला देवीमुक्त केले.

देवी निर्मूलन झाले. ते जागतिक पातळीवर जाहीरही करण्यात आले. पण त्या निर्मूलनात आपल्या नागपूरचा सिंहाचा वाटा होता हे आज फारसे कोणास माहीत नाही. भारतभर पुरेल एवढी लस नागपूरला उत्पादित होत असे. देवी (म्हणजे माता) निर्मूलनाचे केंद्रीय आॅफिस (म्हणजे कचेरी) नागपूरला होते. तीच कचेरी म्हणूनच 'माता कचेरी' म्हणून प्रसिद्ध होती. देवी ऐवजी माता हा हिंदी शब्द वापरण्यात आला कारण नागपूर मध्य प्रांताची राजधानी होती व भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे. आता माता कचेरी हे फक्त नाव राहिले आहे कारण देवी निर्मूलन झाले आहे. आजही तेथे आरोग्य उपसंचालकांचे कार्यालय मात्र आहे. आजही नागपूरला माता कचेरी चौक आहे. परंतु त्याचा उद्गम कोणाला ठावे नाही. माता कचेरी नावामागचा इतिहास नागपूरकरांनी तरी अभिमानाने सांगावा असा आहे. माताकचेरीच्या आवारातच गाई पाळून, त्यांना देवीचा संसर्ग करून त्यापासून लस तयार केली जाई. आज तेथे गाई नाहीत, देवी नाही. नाव फक्त आहे.

देवीचा रोग खरे म्हणजे पुराणांइतकाच पुरातन. इजिप्तमधे इसवी सनापूर्वी ११५७ मध्ये, म्हणजे आजपासून ३१७३ वर्षांपूर्वी मरण पावलेल्या Pharaoh Rameses V, म्हणजे त्या नावाचा पाचवा राजा, याच्या ममीवर (रसायने वापरून सुरक्षित ठेवलेले मृत शरीर) देवीचे व्रण स्पष्ट दिसतात असे म्हणतात. देवीचा रोग अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वीपासून होता असे संशोधकांचे मत आहे.

हा रोग इतका लागट आणि मारक की त्याचा जैविक अस्त्र (biological weapon) म्हणूनही वापर करण्यात आल्याचे दाखले आहेत. उदा:

"Smallpox was also used as a biological weapon by the British. In 1763, Sir Jeffrey Amherst, the Commander-in-Chief of the British forces in North America, wrote to Colonel Henry Bouquet: "Could it not be contrived to send smallpox among these disaffected tribes of Indians?" They did and it decimated the Native American population."

आतंकवाद हा नवा आहे असे आपण समजतो. पण जैविक आतंकवादाचा (bio terrorism चा) इतिहासातला हा दाखला वाचला की अंगावर शहारे येतात. १९६० च्या आसपास देवीमुळे दर वर्षी पाच लाख लोक मृत्युमुखी पडत असत. पुन्हा मानवाने त्या रोगाचा अस्त्र म्हणून उपयोग केला तर?

इतक्या पुरातन रोगावर इलाज शोधायचे प्रयत्न पण तितकेच पुरातन असावे. १७२१ मधे तुर्कस्थानात विलायतेच्या राजदूताची पत्नी असाच एक इलाज तिथल्याच स्त्रियांकडून शिकून आली. हा इलाज रोगापेक्षाही भयंकर वाटेल असा आहे. निरोगी व्यक्तीला काही दिवस उपाशी ठेवून, नंतर त्याचे सुईने टोचून बरेच रक्त काढून टाकीत. नंतर त्याच्या एखाद्या रक्तवाहिनीला थोडे खरवडून त्यावर एखाद्या देवीच्या रोगाची सौम्य लागण झालेल्या रोग्याच्या फोडातील पू चोपडून देत. अशा तऱ्हेने त्याला मुद्दामून संसर्ग करवून इतर तशाच रोग्यांबरोबर डांबून ठेवत. तो बरेचदा दगावतही असे. बरा झालाच तर मात्र तो उरलेल्या आयुष्यभर देवीपासून मुक्त होत असे. जेन्नरवरही लहानपणी असा प्रयोग झाला होता अशी त्याने आठवण लिहून ठेवली आहे. तसे म्हटले तर हा लसीकरणाचाच Primitive प्रकार. रोगाचा इलाज रोग. काट्याने काटा काढणे. पण यात निरोगी व्यक्तीला प्रत्यक्षात तोच रोग होत असे.

तुर्कस्थानातून विलायतेला देवीच्या इलाजाची ही पद्धत आणणारीचे नाव Lady Mary Wortley Montagu असे होते. ती कवयित्रीही होती. कविता करण्याची साथही तशी फार जुनी. आजकाल तर जंतू स्वत:च कविता करतात म्हणे. असो. Small pox कसा रोग्याचे आयुष्य उध्वस्त करतो यावर तिची Flavia शीर्षकाची कविता आहे. प्रसिद्ध आहे. कवितेची नायिका Flavia ही एक सौंदर्यवती मुलगी होती. पण तिला देवीने ग्रासले.

The wretched FLAVIA on her couch reclin'd,
Thus breath'd the anguish of a wounded mind;
A glass revers'd in her right hand she bore,
For now she shun'd the face she sought before.

How am I chang'd ! alas ! how am I grown
A frightful spectre, to myself unknown!
Where's my Complexion? where the radiant Bloom,
That promis'd happiness for Years to come?
Then with what pleasure I this face survey'd!
To look once more, my visits oft delay'd!
Charm'd with the view, a fresher red would rise,
And a new life shot sparkling from my eyes!

Ah! faithless glass, my wonted bloom restore;
Alas! I rave, that bloom is now no more!
The greatest good the GODS on men bestow,
Ev'n youth itself, to me is useless now.
There was a time, (oh! that I could forget!)
When opera-tickets pour'd before my feet;
And at the ring, where brightest beauties shine,
The earliest cherries of the spring were mine.
Witness, O Lilly; and thou, Motteux, tell
How much Japan these eyes have made ye sell.
With what contempt ye you saw me oft despise
The humble offer of the raffled prize;
For at the raffle still the prize I bore,
With scorn rejected, or with triumph wore!
Now beauty's fled, and presents are no more!

For me the Patriot has the house forsook,
And left debates to catch a passing look:
For me the Soldier has soft verses writ;
For me the Beau has aim'd to be a Wit.
For me the Wit to nonsense was betray'd;
The Gamester has for me his dun delay'd,
And overseen the card, I would have play'd.
The bold and haughty by success made vain,
Aw'd by my eyes has trembled to complain:
The bashful 'squire touch'd by a wish unknown,
Has dar'd to speak with spirit not his own;
Fir'd by one wish, all did alike adore ;
Now beauty's fled, and lovers are no more!

As round the room I turn my weeping eyes,
New unaffected scenes of sorrow rise!
Far from my sight that killing picture bear,
The face disfigure, and the canvas tear!
That picture which with pride I us'd to show,
The lost resemblance but upbraids me now.
And thou, my toilette! where I oft have sat,
While hours unheeded pass'd in deep debate,
How curls should fall, or where a patch to place:
If blue or scarlet best became my face;
Now on some happier nymph thy aid bestow;
On fairer heads, ye useless jewels glow!
No borrow'd lustre can my charms restore;
Beauty is fled, and dress is now no more!

Ye meaner beauties, I permit ye shine;
Go, triumph in the hearts that once were mine;
But midst your triumphs with confusion know,
'Tis to my ruin all your arms ye owe.
Would pitying Heav'n restore my wonted mien,
Ye still might move unthought-of and unseen.
But oh ! how vain, how wretched is the boast
Of beauty faded, and of empire lost!
What now is left but weeping, to deplore
My beauty fled, and empire now no more!

Ye, cruel Chymists, what with-held your aid!
Could no pomatums save a trembling maid?
How false and trifling is that art you boast;
No art can give me back my beauty lost.
In tears, surrounded by my friends I lay,
Mask'd o'er and trembled at the sight of day;
MIRMILLO came my fortune to deplore,
(A golden headed cane, well carv'd he bore)
Cordials, he cried, my spirits must restore:
Beauty is fled, and spirit is no more!

GALEN, the grave; officious SQUIRT was there,
With fruitless grief and unavailing care:
MACHAON too, the great MACHAON, known
By his red cloak and his superior frown;
And why, he cry'd, this grief and this despair?
You shall again be well, again be fair;
Believe my oath; (with that an oath he swore)
False was his oath; my beauty is no more!

Cease, hapless maid, no more thy tale pursue,
Forsake mankind, and bid the world adieu!
Monarchs and beauties rule with equal sway;
All strive to serve, and glory to obey:
Alike unpitied when depos'd they grow;
Men mock the idol of their former vow.

Adieu! ye parks! — in some obscure recess,
Where gentle streams will weep at my distress,
Where no false friend will in my grief take part,
And mourn my ruin with a joyful heart;
There let me live in some deserted place,
There hide in shades this lost inglorious face.
Ye, operas, circles, I no more must view!
My toilette, patches, all the world adieu!

देवी व इतर भयंकर साथीचे रोग केवळ अंधविश्वासामुळे व धर्माचार्यांच्या स्वार्थामुळे जुन्याकाळी अधिकच बोकाळले. धर्ममार्तंडांनी तर रोगाचा पद्धतशीर गैरफायदाही घेतला. रोगाला दैवी कोपाशी जोडून त्याचा उतारा म्हणून पीडित जनतेकडून नवस सायास, पूजा पाती करवून दान दक्षिणा उकळली. देवाचेही नाम बदनाम केले, जनतेलाही मृत्यूच्या खाईत लोटले व स्वत:चे पोट भरले. या रोगांचा इतिहास वाचला तर स्वार्थ, भोळा विश्वास, अंधश्रद्धा आणि अवास्तव भाविकता व आस्तिकता काय करू शकते हे कळते. असो. या रोगांच्या साथी गेल्या खऱ्या. पण आस्तिकतेची व अंधश्रद्धेची साथ अजूनही जोरावर आहे. लहानपणीच जाणीवपूर्वक या रोगांची लागण केली जाते. म्हातारपणी काही उद्योग राहिला नाही की चांगले चांगले सुशिक्षीत लोक टाळ कुटून, कीर्तन करून त्या रोगांची भोळ्याभाबड्या बायाबापड्यात लागण करतात. त्यांना खतपाणी देतात. दक्षिणाही उकळतात. असो.

अंधश्रद्धेच्या साथीचे निर्मूलन लसीकरणाने होणार नाही. कारण हा रोग बॅक्टेरियामुळे होत नाही. हा मनोरोग आहे. हे लोक मनोरुग्ण आहेत. हे रोग इतर जनावरांना होत नाही. आपण कधी कुत्र्यामांजरांना पूजापाती करतांना पाहतो का? हे देवा, मला आज एक लठ्ठमुठ्ठ उंदीर दे, मी अमुक करीन असे मांजर म्हणते का? फक्त मनुष्यप्राण्यालाच हा रोग होतो. त्याचे व्रण मानवी मेंदूवर पडतात असे म्हणतात.

या मानसिक रोगाचे निर्मूलनही होईलच होईल. एखादा जेन्नर येईलच येईल. विज्ञानजन्य प्रगती या रोगावर अँटिबायोटिकाचे काम करेलच करेल. गुण यायला वेळ लागेल एवढेच.

प्रत्येक वैज्ञानिक शोधामागे काही ना काही controversy, विवाद असतोच असतो. नक्की शोध कोणी लावला हे सांगणे बरेचदा कठिण असते. एक मत असेही आहे की प्रत्येक शोधाकरिता पूरक अशी पार्श्वभूमी तयार व्हावी लागते. ती झाली की कोणीतरी निमित्त होतो व तो शोध लागतो. न्यूटन ऐवजी बंडूच्या डोक्यावर झाडाचे फळ पडले असते तर त्याने सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असता. तो आज Sir Bandu म्हणून प्रसिद्ध असता. असे असल्यामुळेच एकच शोध एकाच वेळी स्वतंत्र रित्या वेगवेगळे लोक लावू शकतात. विज्ञानात असे अनेक दाखले आहेत. तसेच देवीचे झाले का? आपला पण कोणी जेन्नर होता का? आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमधे पण देवीच्या इलाजावर काही भाष्य आहे का? सुश्रुतसंहितेत, चरकसंहितेत काही उल्लेख आहे का? धन्वंतरीने काही लिहून ठेवले आहे का?

हाही एक संशोधनाचा विषय आहे. तुटक तुटक धागे जुळत आहेत. राजसिंहसुधासमग्रहणम् नामक ग्रंथात मसूरिकाचिकित्सा नामक अध्याय आहे असे म्हणतात. राजसिंह, देवीसिंह हे सतराव्या शतकातील बुंदेलवंशाचे राजे. मसूरिका म्हणजे संस्कृत भाषेतील देवीच्या रोगाचे नाव आहे. संचारिचुण्डिका असेही नाव आहे संस्कृतमधे. बाकी संस्कृतमधे नावे खूपच भारदस्त असतात. साध्या बंडूला बांडीवसेन म्हणतात म्हणे. असो. John Bentley (मृत्यु १८२४) ने केलेल्या पुरातन संस्कृत ग्रंथांच्या संशोधनाचा आढावा Aufrecht नामक अभ्यासकाने घेतला व त्यातील काही श्लोकांचे काहीसे तुटक तुटक इंग्रजी भाषांतर असे दिले आहे.

.....There are plukes (grantha, knot, lump) on the breasts of cows, with discharge.
One should collect the pus from them, and protect it carefully.
Preceded by the illnesses of Śītalā, having placed on the surface (pratīka?) of a child,
with a small knife a wound like the wound of a mosquito,
having made it enter into the blood, with the pus itself,
and with the bloods on a little brush, the wise person to what is cured.
The very best physician fearlessly approaches (m-? upaiti) on the child ......

'गाईला येणाऱ्या देवीच्या फोडातील पू मुलाच्या हातावर रक्तापर्यंत पोहोचेल अशी जखम करून लावावा' असे काहीसे  देवी रोगाच्या चिकित्सेबद्दल सांगितले आहे. देवीच्या उपचारावर आपल्या समाजातील pre-Jennerian claim वर बरेच संशोधन आहे. चिकित्सकांनी वाचावे.

http://cikitsa.blogspot.in/2012/07/ms-r.html?m=1

http://cikitsa.blogspot.in/2012/07/smallpox-history-madras-courier-for-12.html?m=1

हे विवरण तर, खरे असो की खोटे, vaccination सारखे झाले. पण मग? पुन्हा आपल्या आचार्यांनी धर्मसभेत त्याविरुद्ध निर्णय दिला होता की काय? तो ग्रंथच इंद्रायणीत बुडवायला सांगितला की काय? जलदिव्य करायला सांगितले की काय? हा रोग देवीचा कोप आहे व तो मंत्रोच्चारानेच बरा होतो असे ठासून सांगितले की काय? मंत्रोच्चार करण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांनाच आहे असे सांगून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून भारतवर्षाला व ओघाने जगाला नंतर काही शतकांनी येणाऱ्या जेन्नरची वाट पाहायले लावले की काय? आणि तोवर आपला धर्मरक्षणाचा व्यवसाय सुरूच ठेवला की काय?

पण असे प्रश्न विचारणारे आपण कोण? आपल्याला तो अधिकार दिला कोणी? आपण म्हणजे पिपीलिका, मुंगी. आपण काही विहंग नाही काही. उगाच असे प्रश्न विचारले तर धर्मसभा आपली 'पिपीलिका चुंबति चंद्रमंडलम्' म्हणून टिंगल करेल. लहान तोंडी मोठा घास घ्या कशाला?

___________________

इंद्रधनुष्य


इंद्रधनुष्य आकाशात दिसत असेल तर ते पाहायला जाणार नाही किंवा पाहिल्यावर इतरांनाही बघायला हाक मारून बोलावणार नाही असा विरळाच. इंद्रधनुष्य पाहायला तिकिट लागत नाही. किंवा ज्ञानासारखेच ते अनेकांनी पाहिले तर त्याचे सौंदर्य कमी होत नाही किंवा रंग फिके पडत नाहीत. आकाशातल्या अनेक चमत्कारांपैकी ते एक. अनादी काळापासून ऊनपावसाशी निगडित हा दैवी चमत्कार घडतो आहे आणि अनंत काळापर्यंत घडणार आहे. पण तो चमत्कार कोण घडवतो, तो बोक्कामुच्चु कोण हा प्रश्न दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत तरी अनुत्तरीतच होता. त्यामुळे त्या प्रश्नाचे डिफाॅल्ट उत्तर तेच होते, जे नेहमी असते. देवच त्याला कारणीभूत होता. तोच बोक्कामुच्चु होता. आपल्यामधे इंद्रधनुष्य तर देवराज इंद्राचे. कोणा ऐऱ्यागैऱ्याचे नाही. बोक्कामुच्चु इंद्रच होता.

श्रावणाचा महिना असावा, सकाळची किंवा संध्याकाळची वेळ असावी. नुकताच पाऊस पडून गेलेला असावा किंवा भुरभुर पडतही असावा आणि फुटक्या ढगातून सूर्य डोकावून पाहत असावा. असा रंगमंच तयार झाला की इंद्राने आपले धनुष्य बाहेर काढलेच समजा. उगवता सूर्य पूर्वेला असतांना इंद्रधनुष्य पश्चिम नभपटलावर, व मावळता सूर्य पश्चिमेला असेल तर इंद्रधनुष्य पूर्वेच्या पडद्यावर. उत्तरेला किंवा दक्षिणेला कधी इंद्रधनुष्य देवाने प्रदर्शनात ठेवल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. कमीतकमी जंबुद्वीपावर तसे कोणी पाहिल्याचा पुराणात तरी उल्लेख नाही. पृथ्वीच्या उत्तर आणि पूर्व धृवावर व त्याच्या आसपासच्या टापूवर असे दिसते असे म्हणतात. पण अशा वदंतेवर माझा विश्वास नाही. माझ्याकरिता सत्यप्रमाण म्हणजे पुराण. अगदी अल्टिमेट. पुराणातले ते सारे सत्य व पुराणबाह्य ते सारे असत्य. असो.

दिसायला सुंदर असते म्हणून इंद्रधनुष्याचा निर्माता दानव नसून देव आहे असे जगभर मानतात. इंद्रधनुष्य पाहू नये, ते अकल्याणकारी आहे असेही फारसे कोठे सांगितले वा सुचविले नाही. एक दोन धर्मात अपवाद असतील. देवनिर्मित गोष्ट मंगलच असायला हवी, नाही का? त्यामुळे ग्रहणासारखा इंद्रधनुष्याला विटाळ वगैरे नाही. ते कोणी राहूने की बिहूने घडविले असा त्यांच्यावर किटाळ पण नाही.

ना विटाळ
ना किटाळ
काय तरी विषय!
अगदी रटाळ

अगदी पवित्र गोमय असे हे देवनिर्मित इंद्रधनुष्य. असे निरुपद्रवी पण सुंदर, रंगीबेरंगी, हाती न येणारे असल्यामुळे कवींचे मात्र फारच आवडते. नर्सरी ऱ्हाईम्स असो की प्रसिद्ध निसर्गकवी, मराठी असो की अमराठी, हाती न येणाऱ्या या गोष्टीला कोणी सोडले नाही व शब्दात पकडण्याचा तरी नेहमीच प्रयत्न केला.

सात रंगो की सात परीयाँ
आसमान पर आई हैं
लाल संतरी और पीली ने
सुंदर घटा दिखाई हैं

नीली हरी और बैंगनी
सबके मन को भाई हैं
बरखा रानी के जाने पर
नील गगन पर छाई हैं

छान चाल लावावी, जमल्यास बोटांनी समोर जे दिसेल त्यावर ठेका धरून तबला वाजवावा, व वयाचे भान हरपून हे बालगीत म्हणावे. आपण थेट गेलेल्या बालपणात पुनश्च जाऊन पोहोचू. कमीतकमी आपल्याच एखाद्या नाती पणतीकडून हे गीत बोबड्या बोलात म्हणवून घ्यावे. निर्भेळ आनंद तो काय?

अगदीच हे सारे आपल्याला न जमले तर, बोटांनी किंवा हाताच्या थापेने तबला वगैरे वाजवायचा संकोच वाटत असेल तर, लिंकवर टिचकी तरी मारावी.

https://m.youtube.com/watch?v=11JUeYxL6Z8

तेवढे तरी करावेच. नाहीतर उगाच पुढे पश्चात्ताप होऊन कविता लिहावी लागेल.

बेरंग अश्या या आयुष्याला इंद्रधनुष्याची नेहमीच साथ
सात रंगाचे इंद्रधनुष्य आठवले की आठवतो लहानपणीचा तो काळ
पाउस पडल्या नंतरची फुललेली बहरलेली ती गुलाबाच्या फुलांची माळ

मनात मात्र प्रश्नांचे काहुर व्हायचे
कुणीतरी सांगावे असे वाटायचे
विचारला तर म्हणायचे कशाला उगी देतो त्रास
इतके प्रश्न विचारून काय परीक्षेत तू होणार पास?

आई मला सांगायची
देवानी काढलीय बघ सुंदर रांगोळी
आजी म्हणायची बाबारे
देवाला राग आलाय, आता राक्षसाच्या मरणाची पाळी

आजोबा म्हणायचे
देवाने उचललाय धनुष्य बाण
बाबा म्हणायचे दुसरं काम नाही का रे तुला
कानाखाली काढू का एक छान?

इन्द्रधनुष्या समवेत आयुष्य ही रंगत गेलं
परंतु मोठेपणी त्याच्या सोबत जगायचं मात्र राहून गेलं
बघता बघता दिवसही सरले, वर्षामागून वर्षे गेली
इंद्रधनुष्य आणि त्याची रंगत दर वेळेस चुकतच गेली

मना वाटते बालपणीचे दिवस ते फिरुनी परत यावे
ते मधुर सुंदर क्षण टिपायला स्मार्टफोनने मात्र सोबत असावे
नव्या उमेदीने जगण्यासाठी काढून टाकावी मरगळीची कात
बेरंग अश्या या आयुष्याला इंद्रधनुष्याची सप्तरंगी साथ

लहान थोरांना सारखेच आनंद देणारे निसर्गचित्र म्हणजे इंद्रधनुष्य. नवपरिणितांनाही नाव घेतांना हे हमखास उपयोगी पडते. आजकाल पूर्वीसारखे 'देवापाशी समई, समईची ज्योत' सारखे उखाणे चालत नाहीत. उखाण्यात सुद्धा टिंगल टवाळी पाहिजे.

'हे म्हणाले माग हवे ते,
मी म्हणाली इश्श ।
अमुकराव जरा बहिरेच बाई,
आणले इंद्रधनुष्य ।।'

हा व तत्सम उखाणे प्रसंग रंगवून जातात.

पण इंद्रधनुष्यावर कविता म्हटले की आपल्या बालकवींना मात्र तोड नाही बरें.

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे ।
क्षणात येती सर सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे ।
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय मांडिले नभोमंडपी कुणी भासे ।
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।

लाजवाब! फक्त ठोंबरेच हे रचू शकतात. पण खरेच हे इंद्रधनुष्य आहे तरी काय? तोरण, फुलांची माळा की पृथ्वीवर उतरलेले आकाशीचे ग्रह? असे प्रश्न विचारायला कविह्रदयच हवे असेही नाही. अगदी निरस बोअरिंग मानवाला पण तो प्रश्न पडेलच. 'मला जे दिसते ते आहे तरी काय?' हा प्रश्न कोणालाही पडतोच. तो मानवाचा स्थायीभाव आहे. इंद्रधनुष्याच्या बाबतीतच बोलायचे झाले तर ते अनेकांकरिता अनेक गोष्टी आहे. अगदी चंद्रसूर्यग्रहणासारखीच ही गोष्ट आहे. जगभर इंद्रधनुष्य काय यावर अनेक समजुती पुरातन कालापासूनच, अगदी पाषाणयुगापासून आहेत.

स्कँडिनेव्हिया, म्हणजे आजचे नाॅर्वे, डेन्मार्क व स्वीडन देश, येथील निवासी इंद्रधनुष्याला पृथ्वी व देवलोक (त्यांचे नाॅर्स धर्मातले देव) यातील जळता पूल मानतात. नाॅर्स धर्म हाही आपल्या हिंदु धर्माप्रमाणेच अतिप्राचीन धर्म. इंद्रधनुष्याला ते त्यांच्या भाषेत Bifrost (बीफ्रोस्ट) म्हणतात. त्यांना काय माहीत ते आपल्या इंद्राचे धनुष्य आहे म्हणून? त्यांचा हा पूल फक्त देव आणि युद्धात मृत्यु आलेले योद्धेच वापरू शकतात. धारातीर्थी पडणारेच फक्त देवांव्यतिरिक्त या पुलाने स्वर्गात (त्यांचा स्वर्ग, त्यांच्या देवांचा पत्ता. आपला नाही.) जाऊ येऊ शकतात. त्या काळीही योद्ध्यांना समाजात किती मान होता तेच यावरून दिसते. देवांचे सतत दानवांशी (त्यांचे दानव. आपले कश्यप व दनुचे पुत्र दानव नाहीत) युद्ध सुरू असते. दानवच बरेचदा जिंकतात. तसे झाले की ते हा पूल, बीफ्रोस्ट जाळून नष्ट करतात. देव मग पुन्हा तो बांधतात. म्हणून हा पूल नेहमीच आपल्याला दिसत नाही. कधीमधी दिसतो.

ईसाई, म्हणजे ख्रिश्चन, धर्माप्रमाणे इंद्रधनुष्य हे मानव व देवांमधले अॅग्रीमेंट Covenant) आहे. त्यानुसार देव पृथ्वीवर पूर न येऊ देण्याची हमी देतात. जोवर इंद्रधनुष्य आहे तोवर पूर येत नाही. पण ते जर नसेल, अॅग्रीमेंट जर नसेल, तर मग मात्र पूर येऊ शकतो.

Noah (नोहा) आणि Jehovah (जहोव्वा किंवा चहोव्वा) ची गोष्ट बायबलात आहे. Noah's Arc म्हणून ही गोष्ट प्रसिद्ध आहे. एका प्रलयात फक्त नोहा, त्याचे सात कुटुंबीय व काही प्राणी वाचले. ते वाचले कारण नोहाने जहोव्वाच्या सल्ल्याप्रमाणे एक कमानदार वाॅटरप्रूफ लाकडी घर बांधले व प्रलयात फक्त तेच तरंगले म्हणून वाचले. बाकी देवावर, म्हणजे जहोव्वावर, विश्वास न ठेवणारे सारे नामशेष झाले. नास्तिकांचे हेच होते साऱ्या धर्मात. व्हायला पण हवे. आजही नास्तिक मेल्याचा आस्तिकांना पोट्टातून आनंद असतो. प्रलयानंतरची प्रजा म्हणजे नोहाची संतान. पण त्यांना जेंव्हा पूर्वी झालेल्या सर्वनाशी प्रलयाची गोष्ट कळली व ते घाबरले, तेव्हा जहोव्वाने नोहाला आश्वासन दिले की पुन्हा मी असा प्रलयंकारी विनाश करणारा पूर येऊ देणार नाही. त्या आश्वासनाची आठवण, Reminder म्हणून जहोव्वाने इंद्रधनुष्य आकाशात उमटवले व अधूनमधून उमटवत असतो. मानव आणि देवांमधला तो करारनामा मधून मधून आकाशात दिसत असतो.

बरीचशी आपल्या मनू व मत्स्यावतारासारखी प्रलयाची ही गोष्ट त्यांच्या धर्मग्रंथात आहे. अशीच गोष्ट कापूसकोंड्याची गोष्ट म्हणूनही आजकाल वाचनात आहे.

http://goshtasangu.blogspot.in/2016/03/blog-post.html?m=1

वर पाहिल्याप्रमाणे त्यांच्या, म्हणजे ईसाई लोकांच्या देवाचा त्यांच्या मनूबरोबर, म्हणजे नोहाबरोबर झालेला करारनामा म्हणजे इंद्रधनुष्य. त्याचा मसुदा असा:

This is what God said: ‘I promise that never again will all people and animals be destroyed by a flood. I am putting my rainbow in the clouds. And when the rainbow appears, I will see it and remember this promise of mine.’

तर एकंदरीत इंद्रधनुष्य दिसणे म्हणजे महापूर येणार नाही याची देवदत्त ग्वाही असते. वरवर पाहता ही समजूत अशी तशीच वाटेल. पण त्यात एक मजेदार खोच आहे. इंद्रधनुष्य नेहमीच ढगातून सूर्य डोकावतांनाच दिसते. म्हणजे ते फक्त दिवसाच असू शकते. इंद्रधनुष्य फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसू शकते. म्हणजे दिवसाचाही बराच वेळ ते असू शकत नाही. इंद्रधनुष्य दिसायला नुकताच पाऊस येऊन गेलेला हवा की जेणेकरून हवेमध्ये अजूनही लहान लहान जलबिंदु तरंगत असावे. किंवा पाऊसच अगदी नाममात्र, भुरभुर येत असावा. मुसळधार पावसात, सरीवर सरी कोसळत असतांना इंद्रधनुष्य दिसत नाही. आणि इंद्रधनुष्य नसेल तर पूर न येण्याची हमी देणारे अॅग्रीमेंट देवांवर बाध्य नाही. विचार करा म्हणजे मजा कळेल. कसा बरोब्बर शब्दात पकडतो आपला देव आपल्यासारख्या गरीब मानवाला.

आॅस्ट्रेलियन आदिवासी जनजातींमधे इंद्रधनुष्य म्हणजे विश्वनिर्माता विशाल अनादी अनंत साप आहे. विष्णूच्या शेषासारखा. तोच सर्व जीवांचा निर्माता आहे. म्हणजेच इंद्रधनुष्य म्हणजे त्या आदिवासींचा ब्रह्मदेव. कोरड्या दिवसात तो जमिनीखालच्या जलाशयात वास करतो, त्यातले पाणी ओढून साठवून ठेवतो व नंतर त्याचाच जमिनीवर येऊन वर्षाव करतो. तो वर्षाव म्हणजेच पाऊस. म्हणून पावसाळ्यातच आपल्याला त्याचे दर्शन होते. खरेच God is great! तो कोणाचाही का असेना!

इंद्रधनुष्याची दोन बाजूची दोन टोके जिथे जमिनीला मिळतात तिथे सुवर्णमुद्रा भरलेले दोन बाजूला दोन हांडे असतात. तिथवर चालत जाऊन मनुष्य जेंव्हा ते हस्तगत करेल तेव्हा पृथ्वीवर सुबत्ताच सुबत्ता येईल व सारी रोगराई नष्ट होईल. इतके साधे काम. पण तो आळशी ढोण मानव त्या दृष्टीने प्रयत्नच करीत नाही. काय बिघडेल त्याचे जरा इंद्रधनुष्यापर्यंत चालत गेले आणि हांडे उकरून काढले तर? पण नाही. 'दे रे हरी, खाटल्यावरी' अशी अॅटिट्यूड.

चंद्रसूर्यग्रहणाइतक्याच जगभर अशा इंद्रधनुष्याबद्दल अनेक धारणा व्याप्त होत्या. वर फक्त त्यातल्या चिमूटभर सांगितल्या. इंद्रधनुष्याच्या प्रकटीकरणामागे ज्याचा त्याचा देव असतो. ते वेगवेगळ्या नावाचे, वेगवेगळ्या रूपाचे, वेगवेगळे देवच बोक्कामुच्चु असतात. पण नेहमीप्रमाणेच काही जणांच्या मनी संशय. देवाविषयी संशय. या संशयाने दोन हजार वर्षांपूर्वी मानवाला पोखरायला सुरुवात केली. त्याने विचार करायला सुरुवात केली. त्याला उत्तर मिळायला सुरुवात झाली.

Descartes, उच्चार करायला देकार्त किंवा देकार्ते. दोन्ही "S" मौन. देकार्त महान तत्वचिंतक, गणितज्ञ व शास्त्रज्ञ. बरेच विद्वान आपल्या आॅफिसमधे मोठ्या अभिमानाने एक वाक्य ठळकपणे लावतात: "Cogito ergo sum". ज्ञानावर संस्कृत व लॅटिन भाषेची छाप अतूट आहे. विज्ञानावर तशीच लॅटिनची. वरच्या प्रदर्शनी लॅटिन वाक्याचा अर्थ आहे 'I think, therefore I am'. 'मी' असण्याचे किती सुंदर प्रूफ. मी विचार करतो, म्हणजेच, किंवा म्हणूनच मी आहे. साध्यम् सिद्धम. विचार न करणारा मृतवत असतो. हे चिंतकांचे, मानवांचे सुप्रसिद्ध ब्रीदवाक्य देकार्त या गृहस्थांचेच.

"Dubito, ergo cogito, ergo sum" हेही त्यांचेच. "I doubt, therefore I think, therefore I am". मनात शंका येते, म्हणून मी विचार करतो, म्हणून मी आहे. ज्यांच्या मनात शंकाच नाही, ज्यांना सर्वज्ञान प्राप्त झाले आहे, ते मृतसमान. देकार्त असेही म्हणतो की "In order to seek truth, it is necessary once in the course of our life to doubt, as far as possible, of all things.". आस्तिकांनीसुद्धा देवाच्या अस्तित्त्वावर संशय घ्यावा. तसेच नास्तिकांनी त्याच्या अनस्तित्त्वावर. "Doubt is the origin of wisdom' हेही त्यांचेच वाक्य. देकार्तची सारीच वाक्ये सुभाषिते. संस्कृत नसून लॅटिन सुभाषिते एवढेच.

देकार्तचा उल्लेख करण्याचे कारण असे की या संशयी प्राण्याने इंद्रधनुष्यावर, कमीतकमीत त्याबद्दल असलेल्या धारणेवर सुद्धा संशय घेतला. देकार्तला जन्मभर संशयपिशाच्चाने ग्रासले होते. इंद्रधनुष्याचे मग काय घेता? १६३७ मध्ये त्याने इंद्रधनुष्याची पहेली सोडवली. बरीचशी. आपण सूर्याकडे पाठ करून उभे असतांना जर आपल्या नजरेसमोर असंख्य पावसाचे थेंब तरंगत असले तर त्याच्या दिशेने मागून येणारे सूर्यकिरण त्या पारदर्शक थेंबात शिरतात. शिरतांना ते थोडे वळतात, सरळ रेषेत जात नाहीत. हे वळण ते गुरुत्वाकर्षणानुळे नाही तर refraction (अपवर्तन) मुळे घेतात. प्रकाश हवेसारख्या तरल हलक्या मिडियम मधून पाण्यासारख्या जड म्हणजे अधिक घनता (density) असणाऱ्या पदार्थात शिरतांना वळतो, वाकतो, वेग कमी करतो व पुढे जातो. तोच किरण थेंबाच्या मागच्या पृष्ठभागापाशी पोहोचला की तिथून थेंबातल्या थेंबात परावर्तित, म्हणजे Reflect, होतो. तसे करून तो समोरच्या पृष्ठभागातून पुन्हा बाहेर निघून आपल्याकडे येतो. थेंबातून बाहेर निघून पुन्हा हवेत शिरतांना प्रत्येक किरण पुन्हा एकदा रिफ्रॅक्शनने वळतो. असा अपवर्तित-परावर्तित-अपवर्तित झालेला किरण आपल्या डोळ्यात शिरतो. तो मूळ किरणाला ४२ अंशाचा कोन करून असतो. काही किरण असेच थेंबात शिरून दोनदा आतल्या आत परावर्तित होऊन मग अपवर्तित होऊन आपल्या डोळ्यात शिरतात. ते मूळ किरणाच्या दिशेला ५१ अंशाचा कोन करून असतात. असे असंख्य किरण असंख्य थेंबातून अपवर्तित-परावर्तित-अपवर्तित होऊन आपल्याला दूर कमानीच्या आकाराचा प्रकाश असल्याचा भास देतात. ती कमान मूळ किरणाच्या दिशेला ४२ अंश कोन करून कंपासने काढलेल्या वर्तुळाचा भाग वाटते. तसेच अपवर्तित-परावर्तित-परावर्तित-अपवर्तित होणारे किरण ५१ अंशाचा कोन करून काढलेल्या वर्तुळाचा भाग दिसतात. अशा प्रकारे एकात एक दोन कमानी असतात. निरखून पहाल तर इंद्रधनुष्य दोन असतात. आतले इंद्रधनुष्य बाहेरच्यापेक्षा थोडे ज्यास्त स्पष्ट असते एवढेच. पण कधी कधी बाहेरचे इंद्रधनुष्य इतके फिक्कट असते की ते सहज दिसत नाही.

पण मग सात रंग कुठून आले? फक्त दोन तेजस्वी कमानी दिसायला हव्या होत्या. ते गूढ उकलायला काही देकार्त सतराव्या शतकात येईपर्यंत वाट पहावी लागली नव्हती. सूर्यप्रकाश कमीककमी तीन रंगाचा तरी बनलेला आहे हे २४०० वर्षांपूर्वीच, म्हणजे देकार्त पेक्षा २००० वर्षांपूर्वीच आलेल्या एका गृहस्थांना माहीत होते. नाव अॅरिस्टाॅटल. महा बुद्धिमान. त्यांनी लोलक (प्रिझम) वापरून प्रकाशाचे पृथ:करण केले होते. त्याही आधीच्या प्राचीन ग्रंथांमधे सूर्यप्रकाश सात रंगांचा बनलेला आहे असा उल्लेख आहे. आपल्या पुराणातल्या सूर्याच्या एकचाकी रथाचे सात घोडेही कदाचित याकडे अंगुलीनिर्देश करीत असावेत.

आणखी एका धर्मात सूर्य हा सात आरे (spokes) असलेल्या चाकासारखा आहे असे सांगितले आहे. हे सात स्पोक्स् सात रंगाचे आहेत. पण सूर्याचे चाक वेगाने फिरते व हे रंग सरमिसळ होऊन आपल्याला पांढरा प्रकाश दिसतो असे सुचविले आहे. हाच सूर्य, म्हणजे हेच चाक पावसात फिरतांना त्याचा वेग कमी होतो व म्हणून आपल्याला ते सात रंग इंद्रधनुष्य म्हणून दिसतात असे सुचविले आहे. सत्य जाणून घ्यायची मानवाची तगमग, इंद्रधनुष्य समजून घ्यायची त्याची ही ओढ त्याच्या मानवत्त्वाचे अविभाज्य अंग आहे.

शोध कोणी एक व्यक्ती लावत नाही. पिढ्यान पिढ्या खपतात सत्य कळायला. इंद्रधनुष्य काय हे कळायला अडीच हजार वर्ष लागले. कमीतकमी ७०-८० पिढ्या. आता शेवटी इंद्रधनुष्याचे पूर्ण चित्र स्पष्ट करण्याचे श्रेय न्यूटनला जाते. पण न्यूटन स्वत:च म्हणतो की दिग्गज शास्त्रज्ञांच्या खांद्यावर उभे राहून त्याने सत्य पाहिले. किती नम्रता! काय तो विनय!

वैज्ञानिक शोध म्हणजे दहीहंडीचा खेळ. मजल्यावर मजले, मजल्यावर मजले उभे केले की सर्वात वरचा तो लहानसा गोविंदा दहीहंडी फोडतो. त्याचे कौतुक होते. पण तो तिथवर पोहोचायला खाली कित्येक खांदे खपले असतात. न्यूटनला हे पक्के माहीत होते. तो प्रामाणिकही होता. म्हणून इंद्रधनुष्याचा प्रश्न त्याने पूर्णतया धसास नेल्यानंतर एका समकालीन वैज्ञानिकाने (Hooke) लिहिलेल्या खाजगी पत्राच्या फेब्रुवारी १६७६ मधे दिलेल्या उत्तरात तो म्हणतो:

"What Descartes did was a good step. You have added much several ways, & especially in taking ye colours of thin plates into philosophical consideration. If I have seen further it is by standing on ye shoulders of Giants."

इतका विनयशील तो होता म्हणून तर निसर्गाने गुरुत्त्वाकर्षण, चंद्रसूर्यग्रहण, इंद्रधनुष्य वगैरे आपली सारी गुपिते त्याच्या कानात कुजबुजली नसतील? याज्ञवल्क्य, अॅरिस्टाॅटल, बोस, देकार्त, न्यूटन हे सारे देवदूतच तर नसतील? विश्वात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्यावाईट गोष्टीत देवाचाच हात आहे असा जो खोटा आळ त्याच्यावर नेहमी घेण्यात येतो त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्या देवानेच तर त्यांची योजना केली नसेल? बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्था स्थापन होण्यातही देवाचाच तर हात नसेल?

कोण जाणे! मनात संशय तर येतोच येतो. संशय आहे म्हणून विचार आहे. विचार आहे म्हणजेच जीव आहे. विचारशक्ती नसलेला मानव मृतप्राय.

Dubito, ergo cogito, ergo sum. अगदी खरे आहे देकार्त साहेब तुमचे म्हणणे.

पण अजूनही, ज्ञान असूनही ते सर्वांपर्यंत पोहोचत नाही. इंद्रधनुष्याचे रहस्य चुकीच्या स्वरूपात सांगितले जाते. शोध घेतला तर इंद्रधनुष्य कां दिसते हे सांगणारी अनेक पुस्तके, व्हिडिओज दिसतात. पण बहुतांश अजूनही चुकीची माहिती देतात. अर्धसत्याचाच बोलबाला असतो. उदाहरणार्थ:

https://m.youtube.com/watch?v=mGY9jV11FuU

अगदी चूक विश्लेषण आहे हे इंद्रधनुष्याचे. ज्ञानाचा अपभ्रंश. वैज्ञानिक सत्य इतकेही सोपे करायला नको की ते असत्य वा अर्धसत्य होईल. विज्ञान म्हणजे काही पुराण नव्हे. बरेच शोधले म्हणजे एखादा व्हिडिओ सापडतो जो सत्याला टच करतो. उदाहरणार्थ:

https://m.youtube.com/watch?v=xkDhQGXqwCM

पण अजूनही, एक गोष्ट मात्र कित्येकांना अचंबित करते. सूर्य जर गोल, जलबिंदू जर गोल, सूर्यकिरण जर त्यात सर्वत्र शिरून अपवर्तित-परावर्तित-अपवर्तित होऊन माझ्या डोळ्यात शिरतात, माझे बुबुळही जर गोल, तर इंद्रधनुष्य गोलाचा वरचा तुकडाच कां? ते धनुष्य कां? Rainbow बो कां? ते वर्तुळाकृती कां नाही?

खरे म्हणजे ते वर्तुळाकृती दिसू शकते. फक्त आपण इतके उंचावर उभे असून ते पाहायला हवे की जिथून क्षितिज जमिनाला खूप खोलावर मिळतांना दिसेल. आपण एका उंचच उंच पर्वताच्या सुळक्यावर असायला हवे. तेंव्हाच नेमकी संध्याकाळ हवी. पाऊस पडून गेलेला हवा. हवेत जलबिंदू तरंगत असायला हवे. व मागे सूर्य ढगातून मिस्किल हासत असायला हवा. इतके सारे जुळून आले की समोर पूर्ण सप्तरंगी गोलाकार दिसेल.  कदाचित दोन. आतल्या गोलाचे रंग आतून बाहेर येतांना VIBGYOR क्रमाने असतील तर बाह्य गोलाचे रंग तसेच आतून बाहेर येतांना उलट्या क्रमाने, म्हणजे ROYGBIV असतील. दोन सप्तरंगी वर्तुळातील भाग अगदी काळा असेल.

पण मग ते धनुष्य नाही. ती तर प्रेशरकुकरची रिंग झाली. बांगडी. इंद्रकंकण. त्याला प्रत्यंचा कुठे लावायची? विद्युल्लतेचा बाण कसा सोडायचा?

खोटे वाटेल कदाचित. पण गोलाकार, पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य पाहायला फार दूर जायला नको. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सह्याद्रीच्या सर्वात उंच साल्हेर किल्ल्यावरून काही जणांनी असे इंद्रधनुष्य पाहिले आहे.

http://sagarshivade07.blogspot.in/2013/10/blog-post_26.html?m=1

जुन्या दस्तऐवजातही तशी नोंद आहे. अशा गोल इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असेही नाव आहे. दधिचींच्या अस्थींपासून तयार केलेले हे वज्र पाहायला मात्र वर सांगितलेले सगळे योग जुळून यायला हवे. कपिलाषष्ठीचा योग. पण विज्ञानाला आता त्याचे भुस्कुट नाही. कारण इंद्रवज्र सुद्धा सूर्याचेच असंख्य जलबिंदूनी सूर्यकिरणांचे अपवर्तन-परावर्तन-अपवर्तन किंवा अपवर्तन-परावर्तन-परावर्तन-अपवर्तन करून दाखविलेले प्रतिबिंब आहे. न इंद्र, न धनुष्य, न वज्र. केवळ प्रकाशाचा खेळ. निव्वळ माया.

पण मग आपल्या पुराणातल्या कथा? जंतुकवीने त्या कथांवर आधारित नेमके इंद्रवज्रा वृत्तात केलेले हे कथन? हा सारा कल्पनाविलासच की काय? इंद्रधनुष्याचा बोक्कामुच्चु म्हणजे देव नाहीच की काय?

आकाशि घेवोनि देवे धनुष्या
घेई करी बाण विद्युल्लता
सोडूनी घे वेध वृत्रासुराचा
तो हो धराशायी एका क्षणी

दैत्यासि पाहोनि आचार्य शुक्र
सांगे नको भीति त्वां मृत्युची
मृत्यूहुनी थोर संजीवनी ही
राहो नभी सप्तरंगी धनू

क्रोधीत होवोनि देवेंद्र आता
दधीची ऋषींची करी याचना
अस्थीतुनी साधुनि इंद्रवज्रा
मारीन मी क्रूर वृत्रासुरा

हो देहत्यागा ऋषी सज्ज आता
हवी त्यांसही दैत्यमुक्ता धरा
घेवोनि राजा करी इंद्रवज्रा
नभी सोडतो सप्तरंगी पहा

क्षणी होतसे चूर तो वृत्र दैत्य
पुन्हा येतसे वज्र इंद्राकडे
ते अस्त्र हो नित्य शक्ती तयाची
कधी वज्र नाही यशा वंचित

पुढे अंजनीपुत्र त्रेतायुगात
जसा झेप घेई नभी अद्भुत
तया बालकासी हवा सूर्य हाती
पुन्हा क्रोध देवनृपा येतसे

पुन्हा सोडता वज्र आकाशमार्गे
करी घाव ते बालका हनुवटी
परी घाव भारी करी इंद्र गर्वा
असे शस्त्र ते हो दुधारी जणू

अजूनी धनू वज्र येता नभात
करी बालवृद्धास आकर्षित
असे सप्तरंगी ढगामाजि येता
कडाडे जणू विश्व आनंदित

आपली आपली श्रद्धा आहे. देवदत्त मेंदूचा आध्यात्माच्या पाकात मुरवणी मुरब्बा घालायचा की तो वापरायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

थोडक्यात सांगायचे तर इंद्रधनुष्य, इंद्रवज्र हे सूर्याचे असंख्य जलबिंदूत पडलेले प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंबाइतकेच सत्य आहे. इंद्रधनुष्याचे दर्शन देणारा बोक्कामुच्चु देव वगैरे नाही. जलबिंदू व सूर्यकिरण परावर्तन व अपवर्तनाच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला इंद्रधनुष्याचा भास करवितात. तेच खरे बोक्कामुच्चु. बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्थेने हे चित्र स्पष्ट करण्यात आपले काम नित्याप्रमाणे चोख बजावले आहे. इंद्रधनुष्य हे मृगजळासारखे आहे, माया आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. इंद्रधनुष्य वापरून, त्याची प्रत्यंचा ताणून, नेम घेऊन विद्युल्लतेचे बाण सोडून ढगांना फोडण्याच्या आरोपातून आपले इंद्रदेव बाइज्जत बरी झाले आहेत. दधीचीला प्राण त्यागायला लावून, त्याच्या हाडांपासून इंद्रवज्र तयार करून त्या अस्त्राने शत्रूचा नायनाट करण्याच्या आरोपातूनही इंद्रदेव निर्दोष सुटले. लहानगा हनुमान जन्मताच सूर्य गिळायला येतो व सूर्याला गिळू पाहणाऱ्या राहूला त्रास देतो हे पाहून त्यावर वज्र टाकून त्याच्या हनुवटीला इजा करायचा इंद्रावर होणारा आरोप पण धादांत खोटा ठरला. देवांवरील हे सर्व आरोप खोटे आहेत हे सिद्ध करायला मानवाला वेळ लागला. पण शेवटी त्याने देवांना न्याय मिळवूनच दिला. विनाकारणच देवराज इंद्रावर बालंट आले होते. पण शेवटी सत्यमेव जयतेच जयते. अज्ञानाची अंधारी रात्र सरून ज्ञानसूर्य उगवलाच. विज्ञानाचे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आलेच आले.

ॐ असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्माऽमृतं गमय।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

विज्ञानाला, आणि खरे म्हणजे स्वत:लाच, मानवजातीने केलेली कळकळीची विनवणी म्हणून हा शांतिमंत्र अगदी चपखल लागू पडतो.

_____________________