बोक्कामुच्चु
काही व्यक्ती इतिहास घडवतात पण त्याची पद्धतशीर नोंद होत नाही. कारण ते इतिहास घडवत असतांना 'आम्ही घडवतो, घडवतो' असा घोष करायला विसरतात. बरे, त्यांना काही विचारावे तर ते काहीही बोलत नाहीत. काही सांगावे तर ऐकतात की नाही ते नक्की सांगता येत नाही. तास अन् तास त्यांच्यासमोर हात जोडून त्यांच्या विनवण्या केल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित न हास्यात बदलते न रागात. ते तसेचे तसेच राहते. म्हणू नये, पण नाकावरची माशी उडत नाही असे त्यांचे बाह्यदर्शनी व्यक्तिमत्त्व. मग कोण आणि कशी त्यांची दखल घेणार? असेच एक व्यक्तिमत्व होते श्री बोक्कामुच्चु. आजही त्यांचा जन्म कधी झाला, त्यांची जन्मदात्री कोण, जन्मदाता कोण, ते जन्मल्यावर रडले की त्यांना पाहून बाकी लोक रडले, त्यांचा टाळू टणक होता की लपलप करत होता, टाळूवर तिळाचे तेल लावले की खोबऱ्याचे, त्यांना शांत लागली की नाही, ते पालथे कधी पडले, त्यांना पहिला दात कधी आला, त्याचा त्यांना कशाप्रकारे त्रास झाला, दुपटे किती रंगाचे होते, किती दुपटे होते, इत्यादी इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर फारशी विश्वसनीय माहिती नाही. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 'बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्था' स्थापन करण्यात आली. आज या संस्थेच्या जगभर शाखा आहेत. संस्था अधून मधून आपले संशोधन प्रबंध सादर करीत असते. जागतिक, खरे म्हणजे वैश्विक, इतिहासावर व त्याच्या घडणीवर श्री बोक्कामुच्चु यांची जी अमीट छाप पडली होती, आहे व राहणार आहे तिचा एक एक पदर आता उलगडायला लागला आहे. आणि एका अतुलनीय व्यक्तिमत्त्वाशी आपली थोडीफार का होईना, ओळख होते आहे. बोक्कामुच्चु यांचे चरित्र सामान्यापर्यंत पोहोचवायचे महान कार्य बरेच जण करीत आहेत. आपणही असेच काही जाडजूड क्लिष्ट दीर्घप्रबंध सोप्या भाषेत हलके फुलके लघुनिबंध म्हणून येथे सादर करणार आहोत. बोक्कामुच्चूंची ओळख जोवर आपल्याला होत नाही तोवर आपलीच ओळख आपल्यालाच झाली नाही असे म्हणावे लागेल. तशी ओळख व्हावी म्हणून हा प्रयास.
आगामी १४ जुलैला आपण ही निबंधमालिका सुरू करणार आहोत. तो दिवस आहेच तसा नवीन कार्य हाती घेण्याला शुभ. या प्रकल्पाची घोषणा आपण आज, म्हणजे ७ जुलैला करीत आहोत कारण आजचा दिवसही काही असा तसा नाही. हे दोन दिवस म्हणजे दोन सुशिक्षित स्वशिक्षित स्वपराक्रमी स्वयंपूर्ण व्यक्तींचे जन्मदिवस. दोन सुमुहूर्तावर पाय रोवून उभा झालेला हा प्रकल्प तडीस जाईल असे वाटते.
बोक्कामुच्चु हे इतके अवर्णनीय प्रकरण आहे की हजारो निबंध लिहिले तरी ते मुठीत येणार नाही. ते खरोखरच निर्गुण निराकार आहेत असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. पण म्हणून काय झाले? जितके समजतील, जितके उमजतील तितके आपण त्यांना जाणून घेऊ या.
बोक्कामुच्चु होउनि गेले चरित्र त्यांचे पहा जरा ।
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा ।।
७-७-२०१६
_____________________
स्मरणिका
बालवेद
सदाशिव साहित्य
No comments:
Post a Comment